एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके

Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

आकाश नेटके | Updated: Oct 22, 2023, 10:42 AM IST
एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके title=

Heart Attack : गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. खेळताना, व्यायाम करताना अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. तर काही वेळा हृदयविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ केलेल्या उपचारांमुळे बऱ्याच जणांचे प्राण देखील वाचले आहेत. नागपुरात देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. हृदयविकाच्या झटक्यानंतर एका व्यक्तीवर तात्काळ उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

नागपूरच्या रुग्णालयातून हा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. नागपुरात एका रुग्णाच्या हृदयाचे ठोके सुमारे 1 तास थांबले होते. तासाभरात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे मानलं जात होतं. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनी चमत्कार घडला आणि तासाभरानंतर त्याच्या हृदयाचे ठोके परत सुरु आले. 25 ऑगस्ट रोजी एका 38 वर्षीय व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याला 45 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर उपचारानंतर 13 ऑक्टोबर रोजी त्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, या रुग्णाच्या हृदयाचे ठोके 40 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद झाले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋषी लोहिया यांनी त्यांना 40 मिनिटांसाठी सीपीआर देण्याचा निर्णय घेतला. मॉनिटरवर रुग्णाचे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन  दिसत होते. रुग्णाला सीपीआरसह डिफिब्रिलेशन शॉक दिले जात होते. हृदय पुन्हा धडधडू सुरु होईपर्यंत ही क्रिया चालूच होती.

रुग्णालयातील नोंदीनुसार रुग्णाला 45 मिनिटांसाठी सीपीआर देण्यात आला. डॉ. लोहिया म्हणाले की, 'पहिला सीपीआर 20 मिनिटे दिला. त्यावेळी रुग्णाच्या हृदयाचे ठोके 30 सेकंद चालू झाले होते. रुग्णाला कार्डियाक मसाजसोबत शॉकही दिले जात आहेत. त्यामुळे हृदय गती पूर्ववत होण्यास मदत झाली. इतका वेळ मसाज करूनही रुग्णाच्या बरगड्या फुटल्या नाहीत आणि धक्क्याने त्याची त्वचाही भाजली नाही. योग्य उपचारांमुळे हे शक्य झाले.'

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या या व्यक्तीने 3-4 दिवस जळजळ होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 25 ऑगस्टला सकाळी केआयएमएस -किंग्सवे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी तो दोनदा बेशुद्ध पडला होता. त्याला 40 दिवस व्हेंटिलेटरची गरज होती. पण आठव्या दिवसानंतरच तो प्रतिसाद देत होता. आयसीयू नेफ्रोलॉजिस्ट डॉ अश्विनी खांडेकर आणि सर्जन डॉ सुरजीत हाजरा यांनी या रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार करुन त्याचे प्राण वाचवले.