अॅसिडिटी-वजन टाळण्यासाठी काय करावं?

आज नोकरीच्या निमित्ताने वेळेवर खाणे होत नाही. कधीही जेवण घेतले जाते. याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अॅसिडिटीचा त्रास असेल, तर वेळेवर खाणं हे तुम्हाला फार आवश्यक आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 14, 2013, 06:19 PM IST

www.24taas.com,मुंबई
आज नोकरीच्या निमित्ताने वेळेवर खाणे होत नाही. कधीही जेवण घेतले जाते. याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अॅसिडिटीचा त्रास असेल, तर वेळेवर खाणं हे तुम्हाला फार आवश्यक आहे.
अॅसिडिटी टाळण्यासाठी दर दोन तासांनी थोडंथोडं खाल्ल पाहिजे. ज्या पदार्थांमुळे तुम्हाला त्रास होतो ते खाण्याचे टाळावे. जास्त चहा घेऊ नये. आपल्याला नेहमी पूरक आहाराची गरज असते. टॉनिक्स किंवा फूड सप्लीमेंट्स म्हणजे पूरक आहार. जास्त जागरण करू नये. तसेच अति तिखट खाण्याचे टाळले पाहिजे. खाताना बरे वाटते. नंतर अॅसिडीटीचा त्रास होतो तो वेगळा.
शरीरास आवश्यक असणारे घटक जर पुरेशा प्रमाणात शरीरात जात नसतील, तर असा पूरक आहार घेण्याची गरज भासते. मात्र हे पूरक आहार घेण्याआधी आपलं रोजचं जेवणही व्यवस्थित असायला हवं. संपूर्ण जेवण घेतल्यावरही गरज पडली, तरच पूरक आहार घ्यावा. कमी जेवण आणि पूरक आहार अशी जोडी असेल , तर त्या पूरक आहाराचाही योग्य फायदा होत नाही.

वजन वाढीवर मात शक्य
वजन ही शरीराची वाढ आहे. असे असले तरी वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते. व्यायाम करायला हवा. शरीर चपळ राहिलं, तर वजनही नियंत्रणात राहतं. दुसरं म्हणजे, हवं ते खाताना गरज असेल तितकंच खावं. जरुरीपेक्षा जास्त अन्न पोटात गेल्यानेच वजन वाढायला लागतं. अतिरिक्त कॅलरीज वाढतात. त्यामुळे शरीराला जाडपणा येण्यास सुरूवात होते.
वजन अनेक कारणांनी वाढत असलं तरी हायपोथायरॉईडमुळे वजन वाढत नाही; तर वजन वाढल्यामुळे हायपोथायरॉईडचा धोका संभावतो. त्यामुळे नेहमी वजन कमी किंवा समतोल असणे केव्हाही चांगले. त्याचा भविष्यात तुम्हाला त्रास होत नाही.
आम्ही पट्टा लावून वजन कमी करू शकतो. किंवा कॅप्सूल घेतल्याने वजन कमी होवू शकते, असे जाहिरातीच्या माध्यमातून दाखविले जाते. मात्र, असे काही होत नाही. त्यामुळे जाहिरातींवर किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरविले पाहिजे. जाहिरातीची माहिती मिळाल्यावर ती तपासून पाहा, त्यावर विचार करा, तज्ज्ञांशी सल्लामसलत करा आणि मगच निर्णय घ्या.
सगळ्याच जाहिराती बरोबर असतील असं नाही. आपली जी आहार संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, ती एखादी जाहिरात वाचून बदलू नका. जाहिरातीत जे छापून आलं असेल ते वाचून त्यावर मनन-चिंतन करा आणि योग्य वाटली तरच त्याची अंमलबजावणी करणे योग्य होईल. नाहीतर उगाच वेळ आणि पैसा वाया जाईल, हे लक्षात ठेवा.
जेवणात जास्त तेल आरोग्यासाठी चांगले नाही. जे पदार्थ बनवायला जास्त तेल लागतं त्या पदार्थांसाठी तेवढं तेल वापरावं. पण आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार शेंगदाण्याचंच तेल वापरा. आजकाल ऑलिव्ह ऑईल किंवा बाकीची तेलं याच्या जाहिराती केल्या जातात. पण महाराष्ट्रीय लोकांसाठी शेंगदाण्याचं तेल खूप उपयुक्त आहे.