Delhi New CM: दिल्लीत तीन दशकांनंतर भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलीय. सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा रंगलीये. परवेश वर्मांसह सहा जणांची नावं सध्या चर्चेत आहेत. दरम्यान भाजप दिल्लीची धुरा कुणाच्या खांद्यावर देणार याकडे आता लक्ष आहे.
दिल्लीच्या निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व असा विजय मिळवलाय.. त्यानंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवालांचा पराभव केलेल्या भाजपच्या परवेश वर्मांची मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात असती तरी भाजपकडून परवेश वर्मांसह अन्य सहा जणांची नावे चर्चेत आहेत.
भाजपकडून परवेश वर्मा, कैलास गहलोत, विजेंद्र गुप्ता, कपिल मिश्रा, सतीष उपाध्याय, आशिष सूद आणि रेखा गुप्ता हे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत.
भाजपकडून जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय..त्यामुळे दहा वर्षांत लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली नसल्याचं ही त्यांनी म्हटलंय. दिल्लीत आपचा पराभव झाला तरी ते लोकशाहीचा सन्मान करतात. मात्र, बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय. दिल्लीतील भाजपच्या विजयावरून महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असं असलं तरी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार, हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान आज आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडं सोपविला होता. दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळेपर्यंत आतिशा कार्यवाहक मुख्यमंत्री असणार आहेत.
पंतप्रधान परदेश दौ-यावरून आल्यानंतर दिल्लीत नवीन सरकार स्थापन होणार आहे. NDAशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. दिल्लीत शपथग्रहणाचा भव्य सोहळा होणार आहे.
भाजप मुख्यालयातल्या बैठकीत शपथविधी सोहळ्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.