एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी

Maharashta Assembly Election:  नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.

Pravin Dabholkar | Updated: Oct 22, 2024, 09:15 PM IST
एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी title=
गणेश नाईक

Maharashta Assembly Election: नवी मुंबईतील भाजपचे नेते संदीप नाईक यांनी कमळ बाजुला सारत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतलीय.ते तुतारी चिन्हावर बेलापूर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र यामुळे गणेश नाईक यांच्या कुटुंबात दोन पक्ष आणि दोन झेंड्यांची एन्ट्री झालीय.

नवी मुंबईतील राजकारण हे गणेश नाईक यांच्या भोवती फिरत आलंय.नवी मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.. गणेश नाईक यांचे पूत्र माजी आणदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलीय.ते बेलापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिगंणात उतरणार आहेत. त्यांच्या सोबत भाजपच्या 28 नगरसेवकांनीही तुतारी हाती घेतलीय.भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे संदीप नाईक यांनी हा निर्णय घेतलाय. वडील गणेश नाईक भाजपच्या तिकीटावर ऐरोली मतदारसंघातून तर मुलगा संदीप नाईक तुतारीच्या चिन्हावर बेलापूरमधून रिंगणात उतरताहेत..  

संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश प्रवेश केल्यानं नवी मुंबईतील राजकीय गणितं बलदणार आहेत. आगामी काळात नवी मुंबईतील राजकारणामध्ये अनेक उलथापालथी पाहायला मिळणार की दोन झेंडे एक मत अशी परिस्थिती गणेश नाईक आणि संदीप नाईक या पितापुत्रांची असणार हे पाहणं महत्वाचं आहे. 

बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ 

बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये. ही फक्त सुरुवात असून पुढच्या दहा दिवसांत बीड भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तसे संकेत दिलेत.बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार जागांवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. 2019मध्ये सहाच्या 5 जागा लढवणाऱ्या भाजपला यावेळी अवघ्या दोन जागांवरच लढायला मिळणार आहे. ही अस्वस्थता शरद पवारांनी हेरलीये. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीपासून व्युहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं येत्या काळात भाजपचा बालेकिल्ला रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.