रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: राज ठाकरेंनी रतन टाटांना एका पोस्टमधून यापूर्वीच श्रद्धांजली वाहिली असली तरी त्यांनी नोंदवलेली एका वाक्यातील ही प्रतिक्रिया कार चालवतानाही आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 16, 2024, 10:18 AM IST
रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले? title=
राज ठाकरेंनी कार चालवताना नोंदवली ही प्रतिक्रिया (फाइल फोटो, सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या रतन टाटांचं 9 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. समाजिक जाण असलेला एक उत्तम उद्योजक भारताने गमावल्याबद्दल उद्योग जगताबरोबर राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनीही भावूक होत आदरांजली वाहिली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचाही समावेश आहे. राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. मात्र 10 तारखेला रतन टाटांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाचा दाखला देतही राज यांनी एक सुरेख संदर्भ देत या उद्योजकाबद्दल आदर व्यक्त केल्याची माहिती एका अभिनेत्याने दिली आहे.

नेमकं घडलं काय?

झालं असं की, राज ठाकरेंशीसंबंधित 'येक नंबर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका धैर्य घोलप याने साकारली आहे. या चित्रपटाच्या विशेष शोसाठी राज ठाकरेही उपस्थित होते. मात्र 10 तारखेच्या रात्री झालेल्या या विशेष शोसाठी जेव्हा राज ठाकरेंची कार थेअटरबाहेर पोहोचली तेव्हा ते ड्रायव्हींग सीटवर होते तर त्यांच्या बाजूला धैर्य घोलप बसलेला दिसून आलं. हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या नवऱ्या कलाकाराच सार्थ्य राज ठाकरेंनी कसं काय केलं असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र यामागील नेमका घटनाक्रम धैर्य घोलपने सांगितला.

रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...

"पावसामुळे आमची तारांबळ उडाल्याचं त्यांनी पाहिलं. ते आम्हाला म्हणाले मुलांनो तुम्ही माझ्या कारमध्ये बसून माझ्याबरोबर चला. आम्ही म्हणालो साहेब तुमच्यासोबत? त्यावर माझ्यासोबत आलात तर वेळेत तरी याल असं साहेबांनी म्हटलं. त्यानंतर पाऊस पडायला लागला," असं धौर्य घोलपने सांगितलं. पुढे बोलातना धौर्यने रतन टाटांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या सायंकाळी पडलेल्या पावसाचा संदर्भ दिला. "त्याच्या आदल्या दिवशी रतन टाटांच निधन झालं होतं. इतक्या वीज कडाडत होत्या. आम्ही सी लिंकवर होतो. इतका पाऊस म्हणजे मी एवढा पाऊसच यापूर्वी अनुभवला नाही. गाड्या पाचच्या स्पीडने चालत होता. साहेबांचा ताफा होता. पुढे पोलिसांची गाडी होती. त्यावेळी राजसाहेब एक वाक्य म्हणाले, की रतन टाटा बहुतेक स्वर्गात पोहोचले असतील. त्यांचं स्वागत सुरु असेल म्हणूनच या वीजा कडकडाटत असणार. ते ऐकून मला असं भरुनच आलं की त्यांची विचार करण्याची पद्धत किती वेगळी आहे," असं त्या प्रवासाचा किस्सा सांगताना धौर्य घोलप म्हणाला.

नक्की वाचा >> ₹20000000000 चा प्रोजेक्ट रतन टाटांनी 'त्या' एका शब्दाच्या SMS मुळे गुजरातला हलवला! मोदींचा खुलासा

आपण फक्त वेचत राहिलं पाहिजे

"ते (राज ठाकरे) गोष्टींकडे किती वेगळ्या दृष्टीकोनाकडून बघतात. मी वेगळ्याच गोष्टीसाठी पूर्वी नव्हर्स होतो. की साहेबांसारखा माणूस शेजारी बसलाय. पुढे पोलिसांच्या गाड्या आहेत. त्यात आपल्याला जुहूला वेळेत पोहोचायचं आहे. त्यात हा न थांबणारा पाऊस, विजा कडाडत आहेत. त्यात साहेबांनी असं काहीतरी बोलणं म्हणजे... मला आता बोलातनाही भरुन येत आहे की ते खूप वेगळ्या पद्धतीची व्यक्ती आहे. आपण केवळ पदोपदी त्यांच्याकडून मिळेल ते वेचलं पाहिजे," असं धौर्य घोलप म्हणाला.

दरम्यान, येक नंबर चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतने निर्मिती क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाला तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.