'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे.

Updated: Nov 30, 2019, 11:30 AM IST
'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान title=

मुंबई : महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला आव्हान दिलं आहे. बहुमतावर विश्वास असेल, तर गुप्त मतदान घ्या, घाबरता कशाला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. आमदारांना १ महिना डांबून ठेवलं आहे. अशा पद्धतीने सरकार चालवता येणार नाही, असं पाटील म्हणाले.

नवीन सरकारने शपथविधी घेतल्यापासून विधिमंडळाचे सगळे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे. हंगामी अध्यक्ष नियुक्त केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत हंगामी अध्यक्ष कायम असतात, पण या सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला. सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाआधी अध्यक्षपदाची निवडणूक होते, पण यांनी आधी विश्वासदर्शक ठराव ठेवला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने आमचं आव्हान स्वीकारावं, त्यांनी ११९ आमदार कुठे आहेत ते दाखवावं. भाजपचे आमदार चलबिचल झाले आहेत. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले काही आमदार स्वगृही परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केलं तर भाजप रिकामं होईल, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.