मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 9, 2024, 08:45 PM IST
मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...' title=
संग्रहित फोटो

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : नागपूर-गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत (nagpur goa shaktipeeth expressway) मोठी माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट (Mahayuti Government Dream Project) असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक मिळाला आहे.  शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणुन ओळखला जातो.  राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग  वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर सरकारने  महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती.  मात्र आता शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य सरकरने मोठा निर्णय घेतला आहे. 

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा
शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूरात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 'एक बार मैने कमिटमेंट दिया तो,  मै खुद का भी नही सुनता हुं' असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

काय आहे शक्तीपीठ महामार्ग?
2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा  केली होती.  हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता.  राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं होतं. श्क्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग पर्यंत नियोजित होता.  शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार होतं.  2030 मध्ये हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा विचार होता. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार होता.  

कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तीपीठ महामार्ग?
सहा पदरी असणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार होत. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग नियोजित होते.