हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....

उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 26, 2013, 12:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही. बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जवळजवळ २० जणांना प्राण गमवावे लागलेत. पण, आपल्या कर्तव्यापासून न डगमगता हवाई दलाचे जवान बचावकार्यासाठी हजर झालेत. खराब हवामानामुळे त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या आपत्तीमध्ये आत्तापर्यंत ८०० लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालाय. उत्तराखंडचे मुख्य सचिव सुभाष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे या भागात अजूनही (मंगळवारी संध्याकाळी) जवळजवळ ५००० लोक अडकल्याची शक्यता आहे. लष्कर, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या बचावकार्यावर पावसामुळे परिणाम होतोय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ तासांस चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवलीय.

बद्रीनाथ धाम आणि जवळपासच्या भागांत २५०० तीर्थयात्री आणि जवळजवळ दीड हजार स्थानिक लोक अजूनही अडकलेत. हवाईदलानं ४३५ जणांना तिथून बाहेर काढलंय. केदारघाटीमध्ये बचावकार्यामध्ये एका गुफेजवळ ८६ साधु-संत सुरक्षित सापडलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.