पराभव मान्य, भाजपच्या मागणीला अर्थ नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2014, 04:38 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. त्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन! हा कौल आम्ही स्वीकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जे संख्याबळ मिळाले आहे ते पाहता देशात पुढील पाच वर्षे राजकीय स्थैर्य असेल, ही यातील जमेची बाजू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कौल स्वीकारून एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली पाहिजे व आम्ही ती पार पाडू.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संख्येत तुलनेने फार मोठी घट झालेली नाही. भाजपला चांगले यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीचा कौल राज्यातील जनतेने दिला आणि त्याचा लाभ शिवसेनेलाही मिळाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने यापुढेही एकजुटीने काम केले पाहिजे आणि तिच आमची भूमिका राहील.
सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यातील भाजपने केली असली तरी या मागणीत अर्थ नाही, कारण या निवडणुकीला लोकसभेचा संदर्भ होता. ती केवळ राज्याची निवडणूक नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने या पराभवाची जबाबदारी घ्यावी या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे पवार म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.