भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना

Updated: Nov 7, 2015, 11:56 PM IST
भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना title=

हेमंत महाजन / सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे . त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे आणी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पाण्याकरिता जवळजवळ युध्दच सुरु आहे. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही.

ब्रम्हपुत्रा नदीला चीनमध्ये सँगपो यॉरलॉग असे म्हटले जाते. ज्यावेळी  ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते त्यावेळी तिचे नाव सियांग होते. अरुणाचल प्रदेशमधून ही नदी आसामच्या पठारावर येते त्यावेळीस तिचे नाव ब्रम्हपुत्रा असे होते. भारतामधून ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते, तिथे तिला मेघना या नावाने ओळखले जाते. ब्रम्हपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये थांगलूंग ग्लेशियर म्हणजे थांगलूंग हिमनदीतून ५,३०० मीटर उंचीवर होतो. त्यानंतर ही नदी १६२५ किलोमीटर अंतर चीनमधून वाहाते आणि ग्रेड बेंड या पर्वताशी वळण घेऊन भारतात प्रवेश करते. त्यानंतर ९१८ किलोमीटरचे अंतर ती भारताच्या अरुणाचल प्रदेश व आसाम या प्रदेशातून वाहते आणि ३३७ किलोमीटरचे अंतर बांगलादेशातून वाहून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीचे महत्त्व इशान्य भारताकरता फार मोठे आहे.

तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रेच्या पाण्याची गरज नाही  
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि हिमकडे हे वितळत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा दुष्काळ वाढत जाणार आहे. ब्रम्हपुत्रा नदीतून भारतात येणार्या पाण्याचे प्रमाण हे १९९९ पासून १५ ते २० टक्क्यांनी कमी झालेले आहे. तिबेट हे भारत, बांगलादेश तसेच दक्षिण-पूर्व आशियामध्ये वाहणार्या अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. चीनमध्ये २०३० पर्यंत २५ टक्के पाणी कमी होणार आहे. चीनचा फार मोठा भाग वळवंटी आणि डोंगराळ आहे. यामुळे इथे पाण्याची नेहमीच कमतरता असते. यामुळे चीनने त्यांच्या प्रदेशात वाहणार्या यांगसे या नदीवर जगातील सर्वांत मोठे थ्री गॉर्जेस नावाचे धरण बांधले आहे. आता चीनमध्ये कोणतीही नदी धरण बांधण्यासाठी शिल्लक राहिलेली नाही व आता चीनमध्ये पाण्याची कमतरता आहे. यामुळे २००२ साला पासून चीनने आपले लक्ष ब्रह्मपुत्रा नदीकडे वळवलेले आहे. तिबेटमध्ये जिथे ब्रम्हपुत्रा नदी उगम पावते तेथील लोकसंख्या फार विरळ आहे.तिबेटमध्ये शेती करता येत नसल्याने व कारखानेही नसल्यामुळे तिबेटमध्ये असणाऱ्या ब्रम्हपुत्रेच्या पाण्याची गरज तिबेटी जनतेला नाही. 

पुढील दहा वर्षांत ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती
ब्रम्हपुत्रेचे पाणी चीनच्या इतर दुष्काळी भागात वळवले तर चीनला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे  गेल्या काही वर्षांमध्ये ब्रम्हपुत्रेवर चार मोठी धरणे बांधलेली आहेत. डागु या जागी बांधलेले धरण ६४० मेगावॉट वीज, जिक्सू या गावात आणि थांगमू गावामध्ये बांधलेल्या धरणांपासून ५१० मेगावॉट वीज, जिगच्या भांगात बांधलेले धरण हे ३२० मेगावॉट वीज निर्माण करते. पुढील दहा वर्षांत तिबेटमध्ये ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन चीनने केले आहे. 
ग्रेट बेंड या पर्वतापाशी वळण घेऊन ब्रम्हपुत्रा नदी भारतात प्रवेश करते. ग्रेट बेंडवर चीन जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याच्या प्रयत्नांत आहे, कारण ही जागा धरण बांधण्याकरिता अतिशय उत्कृष्ट आहे. चीनमधील झांगमू हे धरण भारतीय सीमेपासून २०० किलोमीटर दूर आहे. तसेच ब्रम्हपुत्रानदीवर पुढील दहा वर्षांत आजून २८ धरणे बांधण्याचे चीनचे नियोजन आहे. याबाबत चीन जगाला सांगत आहे की, हे जे पाणी अडवले जात आहे ते वीज निर्मितीसाठी तात्पुरते अडवण्यात येत आहे आणि वीज निर्मितीनंतर ते पुन्हा ब्रम्हपुत्रेच्या पात्रात सोडण्यात येईल. त्यामुळे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात येणार्या पाण्यात कमतरता येणार नाही. पण हे अर्थातच खोटे आहे. ब्रम्हा चे्लानी या भारतीय तज्ज्ञाने अशी धरणे बांधली गेली तर भारताचे किती मोठे नुकसान होईल या विषयावर भारताचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. 

चीनला अतिप्रचंड प्रकल्प करण्याची सवय 
हे धरण बांधल्यानंतर या धरणाचे पाणी यांगसीकॅग आणि यलो नदीच्या पात्रात सोडता येईल का? तज्ज्ञांच्या म्हणण्या प्रमाणे हे पाणी कमीत कमी २०० मीटर वर उचलून खाली सोडावे लागेल. त्यानंतरच ते कालव्यांच्या माध्यमातून या दोन नद्यांच्या प्रवाहात नेण्यात येऊ शकते. यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च येईल. काही तज्ज्ञांच्या मते २०० मीटर पाणी वर चढवणे सोपे नाही. त्याकरिता प्रचंड वीज निर्मिती करावी लागेल आणि यासाठीच चीन ब्रम्हपुत्रेवर धरणे बांधून ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. या विजेचा वापर हे पाणी वर उचलण्यासाठी केला जाणार आहे. 

भारताने या सर्व हालचालींवरती सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवायला हवे. अन्यथा चीन आपल्याला गाफील ठेवून मोठे धरण बांधून मोकळाही होईल.जसे भारताचे पाणी चीन पळवत आहे तसेच व्हिएटनाम आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांचेही पाणी चीन पळवण्याच्या प्रयत्नात आहे. चीनविरुद्ध जर पाण्याकरता लढाई झाली तर आपल्याला व्हिएटनाम आणि दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांची एक मोट बांधून या लढाईची तयारी केली पाहिजे. 

भारतातील चीनी प्रेमी तज्ज्ञ 

भारतातील चीनी प्रेमी तज्ज्ञांना असे वाटते की आपण उगीचच या विषयाचा बाऊ करत आहोत.चीनला भारताविषयी पुष्कळ राग आहे. कारण अशीया खंडामधे केवळ भारतच त्यांचा प्रतिस्पर्धी बनु शकतो.चीनला असे वाटते की भारताने फक्त भारतखंडातच अडकून राहावे आणि त्याकरिता चीन पाकिस्तानला आपला प्रतिस्पर्धी म्हणुन तयार करत आहे. ज्यावेळी भारतीय आपापसात भांडण्यात गुंतलेले असतात ,भारतीय संसदेत काहीच काम होत नाही, त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती होत नाही, त्यावेळी चीनला नक्कीच आनंद होतो. 
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या  वेग चीनपेक्षा जास्त वाढला 

गेल्या दीड वर्षात आपल्या देशात लोकशाहीच्या नावाने चालणारा गोंधळ सुरू असूनसुद्धा आपण देशामध्ये जगातिल सर्वांत जास्त थेट विदेशी गुंतवणूक आणू शकलेलो आहोत. याशिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेच्या  वेग चीनपेक्षा जास्त वाढलेला आहे. यामुळे अर्थातच चीनला दुःख होत आहे. चीनचे पंतप्रधान झि जिंग पिंग जेव्हा पाकिस्तान भेटीला गेले होते तेंव्हा  त्यांनी ४६ बिलियन डॉलर्स इतका मोठा इकॉनॉमिक कॉरिडॉर हा ग्वाडारपासून चीनपर्यंत निर्माण करण्याचे ठरवले आहे. पण हा काराकोरम रस्ता हा वर्षातील सहा महिने बंद असतो. 
भारताला काही ना काही त्रास द्यायचा म्हणूनच एखाद्या वेळी ब्रम्हपुत्रेचे पाणी वळवण्याचा मोठा प्रकल्प चीन हाती घेऊ शकतो. जर हे धरण बांधले गेले तर भारतात येणारे पाणी पावसाळ्याच्या काळात ३० टक्क्यांनी आणि उन्हाळ्यात ते ६० टक्क्यांपर्यंत घटू शकते.

विसाव्या शतकामधील युद्ध हे जमिनिकरिता झाली, २१ शतकातील युद्धे ही तेलासाठी झाली आणि २२ व्या शतकातील युद्ध ही पाण्याकरिता होतील. म्हणूनच भारताने तयार राहिले पाहिजे. जर आपण सावध असू तरच चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी वेगळ्या ठिकाणी वळवायच्या आतच आपण त्याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय मत तयार करू शकतो. पण त्याकरिता आपल्याला जागरू्क राहण्याची गरज आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.