जन आशीर्वाद यात्रा तिस-या लाटेला आमंत्रण, संजय राऊतांची टीका

भाजपचा ग्राफ कोसळतोय, संजय राऊतांची टीका 

Updated: Aug 18, 2021, 12:29 PM IST
जन आशीर्वाद यात्रा तिस-या लाटेला आमंत्रण, संजय राऊतांची टीका  title=

मुंबई : देशातल्या पहिल्या ५ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. भाजपचा एकही मुख्यमंत्री या यादीत नाही हे भाजपच्या अधोगतीचं लक्षण आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. जनआशीर्वाद यात्रा तिस-या लाटेला आमंत्रण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये 

एका सर्व्हेत देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक सुद्धा या यादीत आहेत. पण भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा चिमटा त्यांनी काढला.