रतन टाटांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचा प्रिय श्वान GOAचा मृत्यू? शांतनू नायडू म्हणाला...

Ratan Tata News: रतन टाटा यांचा प्रिय श्वान गोवा याचे निधन झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य, जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 16, 2024, 09:18 AM IST
रतन टाटांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचा प्रिय श्वान GOAचा मृत्यू? शांतनू नायडू म्हणाला...  title=
Ratan Tata pet dog Goa dead or alive What is the truth behind WhatsApp message

Ratan Tata News: देशातील जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली. रतन टाटा यांच्या अत्यंयात्रेच्या दिवशी संपूर्ण जनसागर उसळला होता. टाटांचे समाजकार्य आणि प्राणीप्रेम हे सर्वश्रूत होतो. त्यांच्या घरात त्यांनी अनेक श्नान पाळले होते. त्यांतीलच त्यांचा आवडता श्वान गोवा याने टाटांच्या निधनानंतर अन्न पाणी सोडले असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता एक पोस्ट व्हायरल होतेय. यात पोस्टमध्ये गोवा श्वानानेही जीव सोडल्याचे सांगण्यात येत आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आता खरे काय ते समोर आले आहे.

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. यात म्हटलं आहे की, एक दुखद बातमी आहे. टाटांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान गोवाचे देखील निधन झाले आहे. म्हणूनच म्हणतात की प्राणी माणसांपेक्षा जास्त इमानदार असतात, असा मजकूर असलेला मेसेज सध्या व्हायरल होत आहे. इन्स्पेक्टर सुधीर यांना जेव्हा गोवाच्या मृत्यूबाबतचा मेसेज व्हॉट्सअॅपवर मिळाला तेव्हा त्यांनी याची पडताळणी केली. 

सुधीर यांनी टाटांचा जवळचा सहकारी शांतनू नायडूला संपर्क केला. त्याने गोवाच्या तब्येतीबाबत विचारणा केली. सुधीर यांनी विचारणा केल्यानंतर शांतनूने त्यांना उत्तर दिलं आहे. गोवा एकदम ठीक असून चिंता करु नका, ही एक फेक न्यूज आहे, असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर सुधीर यांनी इन्स्टाग्राम रील पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

सुधीर यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे की, एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होत आहे. यात म्हटलंयकी रतन टाटा यांचा पाळीव श्वान गोवा याचे निधन झाले आहे. मी शांतनू नायडू यांच्यासोबत चर्चा केली आहे. शांतनू टाटांचा जवळचा सहकारी आहे. त्याने म्हटलं आहे की, गोवा एकदम ठणठणीत आहे. कृपया पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करायला विसरू नका, असं सुधीर यांनी म्हटलं आहे. 

रतन टाटांच्या अंतिम संस्काराच्या वेळी त्यांचा लोकप्रिय श्वान गोवादेखील आला होता. गोवा आणि रतन टाटा यांची गोष्ट फारच रंजक आहे. रतन टाटा जेव्हा गोव्याला गेले होते तेव्हा एक भटका कुत्रा त्यांचा पाठलाग करत होता. तेव्हा त्यांनी त्याला मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोवादेखील अन्य कुत्र्यांसोबत बॉम्बे हाऊसमध्ये राहायला लागला. बॉम्बे हाऊस टाटा समुहाचे मुख्यालय आहे. येथे भटक्या प्राण्यांना आसरा दिला जातो. गोवाच्या केअरटेकरने म्हटलं की, गेल्या 11 वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे. रतन टाटांचे त्याच्यावर खूप प्रेम होते.