Mumbai Local Train Stone Pelting : लोकलवरील दगडफेकीचे प्रकार कधी थांबणार?

मुंबईची लाईफ लाईन म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकल सकाळ ते अगदी रात्री उशिरापर्यंत हजारो, लाखो लोकांना आपल्या निर्धारित स्थळी पोहोचवत असते. मात्र याच मुंबईलोकलने प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला समाजकंटकांकडून धोका असल्याचं कायम निदर्शनास येतं. 

Updated: Nov 14, 2022, 07:24 PM IST
Mumbai Local Train Stone Pelting : लोकलवरील दगडफेकीचे प्रकार कधी थांबणार?  title=

Mumbai Local Train Stone Pelting : मुंबईची लोकल ट्रेन, मुंबईची जीवन वाहिनी आहे. लाखो प्रवासी दररोज या लोकल  ट्रेनचा वापर करत असतात. याच लोकल ट्रेनमधून प्रवास करणं आता तुमच्या जीवावर बेतू शकतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कारण काही समाज कटंक रेल्वे रुळा शेजारी उभे राहून प्रवाशांवर हल्ला करण्याच्या घटना घडताना पाहायला मिळतायत. नुकतीच अशीच एक हल्ल्याची घटना मुंबईत घडली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे घरी जात असताना ट्रेनवर एका व्यक्तीने दगड फेकला तो थेट बनसोडे यांच्या डोक्याला लागला. या घटनेबाबत त्यांनी रेल्वेचा टॅग करत सविस्तर ट्विट सुद्धा केलं आहे.

 

कधी आणि कशी घडली घटना?

दररोज प्रमाणे प्रतीक्षा बनसोडे यांनी  दादर स्टेशन येथून सायंकाळी 7.28 मिनिटाची बोरिवलीकडे जाणारी फास्ट लोकल पकडली. पुढचं स्टेशन बांद्रा होतं. बनसोडे नेहमी प्रमाणे आपल्या सीटवर बसल्या होत्या. लोकल ट्रेन ही माहिम आणि बांद्रा स्टेशनच्या मध्ये होती. लोकल वेगाने पुढे जात होती. इतक्यात एका समाज कंटकाने ट्रेनवर दगड फेकून मारला. हा दगड थेट लोकलमध्ये आला आणि ट्रेनमधील प्रतीक्षा बनसोडे यांच्या डोक्याला लागला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या प्रतीक्षा पुरत्या हादरून गेल्या. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही . मात्र त्यांच्या डोक्याला सूज आली आहे.  घडला प्रकार गंभीर होता. हे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून वेस्टर्न रेल्वेला कळवलं आहे. दरम्यान या सर्व घटनेची तक्रार रेल्वे पोलिसांकडे करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

रेल्वे प्रशासन जबाबदारी घेणार का?

ट्रेनवर दगड मारणं हे निश्चितच विकृती आहे. किंवा ट्रेनवर दगड मारून काय सिद्ध होतं हा प्रश्न अनुत्तरित आहेच. मात्र, लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने-आण करणाऱ्या लोकलवर दगड मारण्याच्या घटना आपण कायम ऐकतो. एखाद्या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यास किंवा त्याची दृष्टी गेल्यास, इतर इजा झाल्यास ही जबाबदारी कोणाची? रेल्वे प्रशासन जबाबदारी घेणार का? दाटीवाटीच्या परिसरातून, झोपडपट्टी भागातून रेल्वे आपली वाट काढत प्रवाशांची ने-आण करते. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून अशा परिसरात संरक्षर जाळी बांधणं आवश्यक आहे. कारण आज जी घटना प्रतिक्षासोबत घडली ती कोणासोबतही घडू शकते. आधीच महानगरातील गर्दीमुळे लोकलच्या प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास असं आपण ऐकत आलो आहोत. ही प्रतिमा बदलणं गरजेचं आहे. समाजकंटकांवर कारवाई करणं, संरक्षक जाळी बांधणं, सुव्यवस्था राखणं ही सर्वस्वी रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.

 

कायमचा बंदोबस्त कधी होणार? 

मुंबईत लोकल ट्रेनवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात. अशा हल्ल्याच्या घटनांमध्ये अनेक मुंबईकर कित्येक वेळा गंभीर जखमी झाले आहे. लोकलमध्ये देखील प्रवाशांनी काळजी घ्यावी अशा सूचना केल्या जातात. पण या समाज कंटकाचा कायमचा बंदोबस्त अद्याप काही झाला नाही.

Mumbai Local Train Stone Pelting continues one more incidet regestered