कोरोना संशयितांच्या मृत्यूवरुन फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना 'हा' इशारा

मुंबईतील एकट्या नायर रूग्णालयातील.... 

Updated: Apr 21, 2020, 08:17 PM IST
कोरोना संशयितांच्या मृत्यूवरुन फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना 'हा' इशारा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपवले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याची परिस्थिती अधोरेखित करत कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे, असा सूर विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळवला आहे. 

मुंबईतील एकट्या नायर रूग्णालयातील अशी ४४ प्रकरणं आपल्या निरिक्षणात असल्याची तक्रार फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

'कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूची अन्य कारणं देऊन मृतदेह परस्पर सोपवण्यात आल्यामुळे मृत्यूसंख्या कमी दिसली आगे. असं असलं तरीही त्यामुळे कोरोनाचा धोका मात्र प्रचंड वाढत आहे', असं या पत्रात म्हटलं गेलं. 

नायर रुग्णालयातील ४४ प्रकरणांचा संदर्भ गेत त्यांनी यामध्ये दोन उदाहरणंही मांडली.  ज्यामध्ये पहिला रूग्ण ४० वर्षीय आहे. तो रुग्ण दि. 12 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी तो रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. ‘लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिस्ट्रेस सिंड्रोम इन अ कोविड सस्पेक्ट’ असं त्याच्या मृत्यूचं कारण देण्यात आलं. त्यांच्यावर झालेल्या उपचारांचे कागदपत्र पाहता त्यावर ‘शिफ्ट टू आयसोलेशन वॉर्ड अँड टेक थ्रोट स्वॅब’ असं लिहिलं आहे. प्रत्यक्षात मात्र तो स्वॅब घेण्यात आल्याचं दिसत नाही. रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच परस्पर देण्यात आला आहे.

असंच आणखी एक उदाहरण मांडत एकट्या नायर रुग्णालयातून आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार ४४ रुग्ण अशाच प्रकारे स्वॅब न घेता कोरोना संशयित म्हणून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्याची बाब फडणवीस यांनी निदर्शनास आणली. 

इतरही रुग्णालयाती कागदपत्र आणि अहवाल पाहता, या सर्व प्रकारामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी तर कमी होतच आहेत सोबतच परंतु त्यांना नॉन-कोविड समजल्यामुळे त्यांच्या घरची मंडळी किंवा जवळच्या नित्य संपर्कातील अतिजोखमीच्या लक्षणे नसलेल्या (हायरिस्क असिम्टोमॅटिक) व्यक्तींचं विलगीकरण आणि चाचणीही होत नाही आहे. परिणामी अजाणतेपणामुळे त्यांना संक्रमण झाले असल्यास ते मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होतो. हे वास्तव त्यांनी मांडलं. एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर तपासणीचा नमुना घेण्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे, त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.