लग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून

 त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.  

Updated: Jun 11, 2019, 08:35 PM IST
लग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून title=

विशाल करोळे / औरंगाबाद : त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.

प्रेमासाठी काहीही, आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र त्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनावही करण्याचा प्रकार औरंगाबादेत उघड झालाय. सोनाली आणि छबादास या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न दुसरीकडे लावले. त्यातून सोनाली आणि छबादास दोघेही नाराज होते. लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. त्यात या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र घरचे शोधून काढतील ही भिती होतीच. त्यातून टीव्हीवर चालणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिकेतून त्यांना एक कल्पना सूचली. त्यानुसार या प्रेमीयुगूलाने एका वारांगणेला आणले, त्यानंतर तिचा खून केला. तिचा चेहरा सुद्धा जाळून टाकला आणि तिच सोनाली असल्याचा बनाव सुद्धा त्यांनी केला. 

त्यानंतर दोघांनी गावातून पळ काढला. खून केल्यानंतर सोनालीचे काही दागिने आणि कपडे खून केलेल्या महिलेच्या अंगावर टाकले त्यामुळं सोनालीच्या कुटूंबियांनी सुद्धा ती सोनाली असल्याचे मान्य केले. मात्र हा खून का झाला हे कोडे काही पोलिसांना उकलत नव्हते. त्यात पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्यांना छबिदासची माहिती मिळाली. पोलिसांनी चाळीसगावला जावून छबिदासला ताब्यात घेतले आणि तिथे सोनालीला पाहून पोलिसांनाही धक्काच बसला, अशी माहिती तपास अधिकारी महेश आंधळे यांनी दिली.

हे सगळे करण्याची कल्पना यांना क्राईम पेट्रोल नावाच्या एका मालिकेतून मिळाली असल्याचे तपास अधिकारी महेश आंधळे यांनी सांगितले. त्यानुसार आरोपींनी कट रचला आणि अगदी त्यानुसार काम करीत कट तडीसही नेला. मात्र जळालेला मृतदेहावरून पोलिसांना संशय आला आणि पुढे सगळेच उलगडत गेले.

खूनानंतर पोलिसांनी सोनालीच्या नवऱ्याला अटक केली होती. मात्र आता खरा आरोपी पुढे आल्याने तिचा पती निर्दोष ठरला. पोलिसांनी प्रेमीयुगूलाला आता अटक केली. मात्र लग्नानंतरही पुन्हा प्रेमिकेला जवळ आणण्यासाठी अशा पद्धतीने गुन्हा करणे धक्कादायक.