फेब्रुवारी महिन्याची सुरुवातच उष्णतेने झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे.
3 फेब्रुवारीपासून राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात 3 ते 4 फेब्रुवारीला हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील तापमानातही फारसा बदल नसून संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हावामान राहणार आहे. गेल्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ झाली होती. पहाटे गारवा व दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती कायम होती. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले.
मुंबईचे सकाळचे तापमान मात्र 16 अंशांपर्यंत खाली आले. यात पुढील दोन दिवसांत मोठी घसरण सुरू राहणार आहे. मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होईल, किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी मुंबईकर 'सुपरकूल'चा अनुभव घेऊ शकणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांत मागील काही दिवसांपासून सकाळी आल्हाददायी वातावरण आहे. किमान तापमान 20 अंशांच्या खालील पातळीवर नोंद होत आहे. शहराच्या दिशेने उत्तरेकडील वारे प्रवाहित राहिले आहेत. तसेच आकाश निरभ्र झाल्याने शहरातील थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानात घट नोंद झाली होती. सांताक्रुझमध्ये कमाल 31.4 आणि किमान 16.6 अंश तापमान होते. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 36 टक्के होती.
मंगळवारी कमाल तापमान 31 अंशांच्याच आसपास राहील, मात्र किमान तापमानात विक्रमी घट नोंद होणार आहे. त्यानंतर आणखी दोन दिवस थंडीची तीच तीव्रता कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
शहर आणि उपनगरांत बहुतांश ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवरच होता. केवळ कुलाबा आणि बोरिवली येथे चांगल्या हवेची नोंद झाली. या दोन ठिकाणी अनुक्रमे 56 आणि 91 इतका 'एक्यूआय' नोंद झाला.
हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीतच!