वंदे भारतची धडक बसताच गाय हवेत उडाली अन्... माजी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचे आधुनिक रुप असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सध्या सगळ्यांच्याच पसंतीच उतरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे अनावरण केले जात आहे. मात्र सुरुवातीपासूनच या रेल्वेला अपघातांचे ग्रहण लागले आहे.

Updated: Apr 20, 2023, 07:36 PM IST
वंदे भारतची धडक बसताच गाय हवेत उडाली अन्... माजी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ title=

Vande Bharat Train : देशातल्या विविध भागांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस ( Vande Bharat Express) सध्या वेगाने धावतेय. 180 किलोमीटर प्रतितास वेगात धावणाऱ्या या ट्रेनला भारतीयांनी पसंती दिली आहे. मात्र काही ठिकाणी या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकवेळा रेल्वे रुळांमध्ये (Railway Track) येणाऱ्या जनावरांची धडक बसल्याने ट्रेनचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. मात्र राजस्थानमध्ये (Rajasthan News) घडलेल्या एका अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातानंतर रुळांवरुन चालणे किंवा रेल्वे रुळाजवळ शौच किंवा लघवी करणे किती धोकादायक असते, याचे उदाहरण राजस्थानमधील अलवरमध्ये पाहायला मिळाले.

झालं असं की वंदे भारत एक्स्प्रेसने एका गाईला धडक दिली होती. त्यावेळी तिथे लघवी करणाऱ्या एका व्यक्तीवर ही गाय पडली अन् यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या गाईला वंदे भारत एक्स्प्रेसने इतक्या जोरात धडक दिली की ती लघवी करणाऱ्या व्यक्तीवर जाऊन पडली. साधारणपणे गाईचे 600 ते 700 किलो वजन असल्याने एखाद्यावर ती पडल्यास व्यक्ती गंभीररित्या जखमी होऊ शकते. असाच काहीसा प्रकार शिवदयाल शर्मा नावाच्या 82 वर्षीय वृद्धासोबत घडला आहे. रुग्णालयात नेले असता शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : परवानगीसाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या पाया पडायला लागल्या... वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

राजस्थान पत्रिकेच्या वृ्त्तानुसार, वंदे भारत एक्स्प्रेसने जेव्हा गाईला धडक दिली तेव्हा शिवदयाल शर्मा हे अपघाताच्या ठिकाणाहून 30 मीटर अंतरावर लघवी करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला आणि शिवदयाल शर्मा यांच्यावर गाय पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तिथे असलेली दुसरी व्यक्ती वाचली. 18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता दिल्लीहून अजमेरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस  अलवरच्या कालीमोरी फाटकातून जात होती. त्यावेळी एक गाय रुळावर आली आणि तिला ट्रेनची धडक बसली. धडकेमुळे गाय हवेत उडाली आणि सुमारे 30 मीटर दूरवर लघवी करणाऱ्या शिवदयाल शर्मा यांच्यावर पडली. यामध्ये गाय आणि शिवदयाल शर्मा दोघांचाही मृत्यू झाला.

शिवदयाल शर्मा हे रेल्वेच्या वीज विभागातून निवृत्त झाले होते. या घटनेनंतर अरवली विहार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाल्याबद्दल कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शवविच्छेदनानंतर शिवदयाल यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

 दुसरीकडे, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी यांनी सांगितले की, रेल्वेला अशा कोणत्याही अपघाताची माहिती नव्हती आणि वंदे भारत एक्सप्रेसच्या कर्मचार्‍यांनीही अशा कोणत्याही घटनेची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेला दिली नव्हती. 12 एप्रिल रोजी जयपूर रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

Vande Bharat Express समोर तरुणाची आत्महत्या

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भंडारा येथे एका तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली होती.  भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर एकलारी परिसरातील रेल्वे मार्गावर तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली. रुपेश चंद्रशेखर साठवणे असं तरुणाचं नाव होते.