शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रति एकर 5 हजार रुपये देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकरावर पाच हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार 

Updated: Dec 21, 2018, 11:43 PM IST
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रति एकर 5 हजार रुपये देण्याचा निर्णय title=

रांची : झारखंड सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकरावर पाच हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री आशीर्वाद योजना असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये जास्तीत जास्त 5 एकर पर्यंत शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. या योजने अंतर्गत झारखंडमधील एकूण 22 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.

दरडोई उत्पन्न 

 दास यांनी दिलेल्या माहितीनुसारस 2019-20 पासून झारखंड सरकार शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति एकर खरीप पिकांसाठी प्रोत्साहन भत्ता देणार आहे. एक एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 5 हजार रुपये दिले जातील. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी राज्य सरकार 2 हजार 250 कोटी रक्कम खर्च करणार आहे. 

शेतकरी स्वावलंबी

 2019-20 च्या आर्थिक संकल्पात ही योजना आणणार असल्याचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याचे ठेवलेले लक्ष्य पूर्ण होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना वीज, खाद्य आणि इतर शेती गुंतवणूकीसाठी बॅंकवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. शेतीसाठी त्यांना कर्ज घ्यावे लागणार नाही. 
 
ही योजना पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी असेल. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार असून त्यातून ते शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करु शकतात.