Uddhav Thackeray Live: 'गोंधळ घालून झालाय, आता वापर करुन यांना फेकून देतील'

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

Updated: Oct 9, 2022, 06:41 PM IST
Uddhav Thackeray Live: 'गोंधळ घालून झालाय, आता वापर करुन यांना फेकून देतील' title=

Uddhav Thackeray Live : शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thacketay Facebook Live) पहिल्यांदाच लाईव्ह आले होते. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून यावेळी त्यांना कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी शिंदे गटावर (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) टीका केलीये. नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग लवकर निर्णय घेईल अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (Uddhav Thackeray Facebook Live)

उद्धव ठाकरे म्हणाले की, अभूतपूर्व दसरा मेळावा झाला. एकीकडे सगळं पंचतारांकीत होतं. दुसरीकडे साधासुधा शिवसैनिक होता. पंचपकवान नव्हते पण अर्धी भाकर घेऊन शिवतिर्थावर आले होते. तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात. उद्धव ठाकरे म्हणून नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे.'

'19 जून 1966 शिवसेनेचा स्थापन दिवस. शिवाजी पार्कचं घर 1 बीएचके होतं. घरी मराठी माणसाची वर्दळ असायची. मार्मिकमधून शिवसेनाप्रमुख मराठी माणसावर होणारा अन्यायाला वाचा फोडत होते. तेव्हा आजोबांनी विचारलं एवढी माणसं येतात पुढे काय करणार आहे. संघटना बनवणार की नाही. तेव्हा माझ्या आजोबांनी शिवसेना असं संघटनेला नाव दिलं. तेव्हा कोणी सोबत नव्हतं. पण सर्वसामान्य लोकं सोबत होती. '

'एक कुरळ्या केसाचा माणूस आला होता. दत्ता साळवी असं त्यांचं नाव होतं. नोकरीचा राजीनामा देऊन ते पक्षात सहभागी होण्यात आले होते. पहिल्यांदा ठाणे पालिकेची निवडणूक आली. पहिलं यश ठाण्याने दिले. अनेक जण श्रमले. त्यातून शिवसेनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. काही वेळेला संकटं देखील आली. अनेकांनी जीव गमावली आहेत. अनेकांनी तुरुंगवाल सोसला आहे. मोडेन पण वाकणार नाही ही जिद्द शिवसेनाप्रमुखांनी बिंबवली.'

'आज समोर येण्यामागचं कारण म्हणजे शिवसेनेचे नाव गोठवलं. निवडणूक चिन्ह गोठवलं. ज्याचा शिवसेनाप्रमुख पूजन करायचे. रावणाने ते चिन्ह गोठवलं. ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं. त्याच्याच काळजात तुम्ही कट्ट्यार घुसवली.'

'काय मिळवलं तुम्ही. ज्या शिवसेनेने मराठी मनाला आधार दिला. हिंदू अस्मिता जपली. ते नाव तुम्ही गोठवलं. अनेकांचे फोन आले. अनेक जण रडत आहेत. पण संकट असेच असतात. त्यातच संधी असते. त्याचं सोनं मी करुन दाखवणार आहे.'

'भाजप त्यांचा वापर करुन घेतोय. पण यांचा उपयोग जेव्हा संपेल त्यांना फेकून दिले जाईल. पण मला खात्री आहे. सगळेच स्वार्थी नसतात. निष्ठा विकत घेता येत नाही. निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत. शिवसैनिकांना दमदाट्या सुरु आहे. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी केले नाही ते तुम्ही करत आहात.'

'तुमचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. काँग्रेसने जे केले नाही. ते तुम्ही करत आहात. मी डगमगलेलो नाहीये. जीवाला जीव देणारे शिवसैनिक सोबत आहेत. बाळासाहेबांचं नाव न घेता जनतेसमोर जा हे माझं तुम्हाला आव्हान आहे. तुम्हाला बाळासाहेब पाहिजे पण त्यांचा मुलगा नको.'

'काही काळासाठी नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. 16 आमदार अपात्र ठरले तर मग काय होणार. काल निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर आपण तीन चिन्ह दिले आहेत. तीन नावं देखील आपण निवडणूक आयोगाला दिले आहेत.'

'अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे. त्यासाठी लवकरात लवकर निर्णय द्या. जनता जो फैसला करेल ते आम्हाला मान्य असेल. लोकशाहीत जनता श्रेष्ठ आहे. लवकरात लवकर चिन्ह आणि नाव द्या अशी विनंती करतोय. दिवस रात्र वैऱ्याची आहे. जागे राहा. झोपू नका. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे.'