Vasai Metro Line: चर्चगेटहून वसई- विरारला जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप आहे. विरार लोकलला भरपूर गर्दी असते. संध्याकाळच्या वेळी या लोकलमध्ये चढणे खूप मुश्कील असते. सकाळी व संध्याकाळीही लोकलला तुडुंब गर्दी असते. मात्र लवकरच या गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता आहे. लवकरच वसई-विरारमध्ये लोकल धावण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून पावलं उचलली जाणार आहेत. वसई-विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. साधारण दीड महिन्यापर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
वसई- विरार- नालासोपार येथे नागरीवस्ती वाढत चालली आहे. त्यामुळं तिथून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळंच वसईपर्यंत मेट्रो नेण्याची घोषणा करण्यात आली. वसई-विरारसाठी मेट्रो 13 ची घोषणा करण्यात आली. भाईंदरच्या खाडीपुलावरुन हा मेट्रो मार्ग धावणार आहे. खाडीपूल करण्याबाबतची संरचनात्मक आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
मेट्रो मार्ग खाडीतून जाणार असल्याने तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा अभ्यास करुन सर्वेक्षणाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होणार आहे. मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीत प्रस्तावित पूल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मीरा रोड ते विरार हा 23 किमीचा मेट्रो मार्ग असून त्यात 20 स्थानकांचा समावेश आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. मेट्रोचा विस्तार सुलभ करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वसई-भाईंदर खाडीवर डबल-डेकर पूल बांधण्याची योजना आहे त्यामुळं खर्चात बचत होणार आहे.