पुढील सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 23, 2025, 06:08 PM IST
पुढील सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-नाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. पुढील सहा दिवसात या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. कारण पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत या महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. 

24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तर 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस या त्रासाला समोरे जावे लागणार आहे. 

सहा दिवस अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी

जुना कसारा घाट दुरुस्ती बंद असणार आहे. त्यामुळे लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर वाहनचालक आणि  प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

रस्ते दुरुस्तीमुळे कसारा घाटातील वाहतूक वळविण्यात आल्यामुळे  मुंबई - नाशिक - शिर्डी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या  सहा दिवसांच्या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांच्या मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र देखील उभारली जाणार आहेत.

मुंबई नाशिक या महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्यांकडून करण्यात येत आहे.