लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईची यंत्रणा सज्ज, नाव नोंदणीसाठी वेबसाईट, अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर जारी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मुंबईत मतदान पार पडणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मतदारनोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

Updated: Apr 3, 2024, 08:30 PM IST
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईची यंत्रणा सज्ज, नाव नोंदणीसाठी वेबसाईट, अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर जारी title=
संग्रहित फोटो

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मुंबईत (Mumbai) मतदान पार पडणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.  लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केलं आहे. मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावं आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसंच मतदार मदत क्रमांक 1950 यावर संपर्क करावा.  याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक 02220822693 सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही संजय यादव यांनी केलं आहे. 

मुंबई शहर जिल्ह्यात  '30-मुंबई दक्षिण मध्य', '31-मुंबई दक्षिण' हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात 24 लाख 59 हजार 443 मतदार असून जिल्ह्यात 20 मे 2024 (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून 2024 (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही संजय यादव यांनी केलंय.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख २६ एप्रिल २०२४
- नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२४ 
- नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख ०४ मे २०२४ 
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ०६ मे २०२४ 
- मतदानाची तारीख २० मे २०२४ 
- मतमोजणीची तारीख ०४ जून २०२४ 
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख ६ जून २०२४ 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार उपाययोजना याबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी,असंही संजय यादव यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक सुरळीर पार पडावा यासाठी मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या '30-मुंबई दक्षिण मध्य', '31-मुंबई दक्षिण'  लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती तसंच भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी संजय यादव यांनी दिली. 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांची माहिती
एकूण मतदार :- २४ लाख ५९ हजार ४४३
एकूण पुरुषः- १३ लाख २८ हजार ५२०
एकूण स्त्री:- ११ लाख ३० हजार ७०१
एकूण तृतीयपंथीः- २२२
ज्येष्ठ नागरिक मतदार (८५+)
एकूण:- ५५ हजार ७५३
एकूण पुरूष :-२६ हजार ७९०
एकूण स्त्री :- २८ हजार ९६२ 

१८ ते १९ या वयोगटातील मतदार
एकूण मतदारः- १७ हजार ७२६ 
एकूण पुरुषः ९ हजार ८७६ 
एकूण स्त्री:- ७ हजार ८५०

नवमतदारांची एकूण नोंदणी ६७२४ (दि.६ जानेवारी ते २ एप्रिल २०२४) 

दिव्यांग मतदार :- ५८१०
एकूण पुरुष:- ३४८५
एकूण स्त्रीः- २३२५ 

मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५०९ 
एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८
एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११
नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८ 
संवेदनशील मतदान केंद्रे:- ८९ 

निवडणूक कामासाठी मुंबई जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज  
निवडणूक आचारसंहितेचं पालन व्हावं, यासाठी फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST) ९४, स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST)-९९, व्हिडीओ व्हिवींग टीम (VVT)- १४, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम (VST)-२४ टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर मुंबई शहर जिल्ह्यातील दि. १६ मार्च ते दि. ३१ मार्च २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीशी संबंधित एकूण ४६१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १५३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित ३०८ तक्रारी या मतदान नोंदणीशी संबंधित नसल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांनी दिली.      

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.