अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mobile Blast​ : नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपी गेला होता. मात्र मोबाईच्या स्फोटामुळे आग लागली आणि हा तरुण गंभीररित्या भाजला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 30, 2023, 10:43 AM IST
अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू title=

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : मोबाईल (Mobile) चार्जिंगला लावून झोपणं एका तरुणाला चांगेलच महागात पडलं आहे. नाशिकमध्ये (Nashik Accidet) मोबाइलचा स्फोट (Mobile Blast) होऊन गंभीररीत्या भाजल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपला होता. मात्र या मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीररित्या भाजला. पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिकच्या मनमाडजवळील कऱ्ही गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रोहित राख असे या मृत तरुणाचे नाव आहे. रोहित नांदगाव येथे शिकण्यासाठी आहे. रात्री अभ्यास करुन रोहित घरात मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेला होता. त्यानंतर मोबाईलचा जोरदार स्फोट झाल्याने आग लागली. मोबाईलचा स्फोट होवून लागलेल्या आगीत रोहित 80 टक्के भाजला होता. गंभीर अवस्थेत त्याच्यावर मनमाड व मालेगाव येथे उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला आहे. रोहितच्या अशा धक्कादायक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

स्मार्टफोन चार्जिंग करताना घ्या काळजी

आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. तुमचा फोन बराच काळ नवीन राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जसे की मोबाईल कधी आणि किती चार्ज करायचा. मोबाईल थोडा जुना झाला की, बॅटरी लवकर संपुष्टात येते. असे वारंवार होत असेल तर आपण मोबाईल कंपनी किंवा बॅटरीला दोष देतो आणि सातत्याने मोबाईल चार्जिंगला लावतो.

पण हे सगळं आपल्या चुकांमुळे होतं. आपल्याला मोबाईल लवकर चार्जिंगला लावण्याची सवय लागते. फोनची थोडीशी बॅटरी उतरली तरी लगेच फोन चार्जिंगला लावला जातो. कधी-कधी आपण रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंगवर लावून ठेवतो. हा क्रम वर्षानुवर्षे सुरूच आहे. तज्ञांच्या मते, सामान्यत: फोनच्या बॅटरीचे आयुष्य दोन ते तीन वर्षे असते. त्यानंतर त्याची चार्जिंग क्षमता कमी होऊ लागते. पण मोबाइल 20 टक्के डिस्चार्ज झाल्यानंतरच चार्जिंगवर ठेवावा. कारण विनाकारण फोन चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते.

तसेच बरेच लोक रात्री मोबाईल वापरल्यानंतर ते चार्जिंगला लावून झोपतात. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला तुमच्या या सवयीचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जेव्हाही तुमचा फोन चार्ज होतो तेव्हा ते उष्णता निर्माण करते. अशावेळी, काही वेळा बेड, कपडे, उशी किंवा ब्लँकेटवर फोन चार्ज करताना गरम किंवा जास्त गरम झाल्यामुळे आग लागू शकते.