Rain News : राज्यात थंडीचा कडाका असताना 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका

Rain News : राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. (Maharashtra Weather) या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update)

Updated: Jan 26, 2023, 08:44 AM IST
Rain News : राज्यात थंडीचा कडाका असताना 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका title=
Maharashtra Rain News

Rain News : राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. (Maharashtra Weather) आधी औरंगाबाद जिल्ह्यात आणि परिसरात पाऊस पडला. (Maharashtra Rain News) त्याच्या दुसऱ्या दिवशी बुलडाणा, अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. बीड, जालना, नेवाश्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update)

याआधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे रब्बीतून काहीतरी हाती येईल, अशी अपेक्षा असतानाच, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून, हाती आलेल्या पीकांचं या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. त्यामुळे रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यताय. हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत पावसाने बुलडाण्यात धोधो कोसळत आहे. सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडातांसह अवकाळी पाऊस झालाय. रब्याबीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काढणीला आलेली आणि काही ठिकाणी काढलेल्या शेतमालाला शेतकरी साठवून ठेवण्याचा आधीच हा पाऊस बरसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. 

पावसामुळे शेतकरी संकटात

नेवाशामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. तालुक्यातल्या सलाबतपूर, दिघी, गोगलगाव, सुरेगाव, गेवराई, जळका गावात सोसाट्याच्या वा-यासह पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसामुळे गहू, मका, कांदा पिकं पूर्णपणे भूईसपाट झालीयत. रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. 

अहमदनगर शहरासह अवकाळी पावसाची हजेरी

अहमदनगर शहरासह दक्षिण भागामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा,कर्जत, जामखेड या भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीतील ज्वारी गहू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला असून थंडी कमी झाल्याचे जाणवत होते...अशातच रात्री अचानक पाऊस सुरू झाला तब्बल एक तास पडलेल्या या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. अवकाळीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

सिंधुदुर्गात दोन दिवसात पावसाची शक्यता 

सिंधुदुर्गात येत्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून दमट वातावरण निर्माण झाल्याने थंडीचं प्रमाण कमी झाले आहे. याचाही फटका आंबा आणि काजू पिकाला बसण्याची शक्यताय. या पिकांवर करपा रोग आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतक-यांना दक्षता घेण्याचे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून करण्यात आले आहे.