'सगळं आताच उघड केलं तर...'; खासदारकीच्या तिकीटाबद्दल बोलताना उदयनराजेंचे सूचक मौन

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून अनेकांनी आता तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 27, 2023, 09:10 AM IST
'सगळं आताच उघड केलं तर...'; खासदारकीच्या तिकीटाबद्दल बोलताना उदयनराजेंचे सूचक मौन title=
(फोटो सौजन्य - PTI)

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : देशात सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra Poltics)  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून (Satara Constituency) अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? असा प्रश्न विचारताच उदयनराजे भोसले यांनी याबाबत सूचक मौन बाळगलं आहे. 

सातारा शहरातील विकासकामांची पाहणी करताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपकडून यावेळी लोकसभेचे तिकीट मिळेल याची खात्री वाटत नाही असं दिसत असल्याची चर्चा आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सगळं आत्ताच उघड केलं तर कसं होणार असं म्हटलं आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

"मी आताच सगळे उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे," असं सूचक विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे. त्यामुळे एकूणच खासदार उदयनराजे यांना खासदारकीची तिकीट मिळण्याची खात्री नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशी होईल याची खात्री आहे.महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाबाबत कायद्यात बदल होणे गरजेचे आहे. साताऱ्यात मागे घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. आठवडाभर वाट पाहूयात, मग पुढील निर्णय घेऊ, असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, 2019 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव करत साताऱ्याची जागा मिळवली होती. मात्र यानंतर भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेचे खासदार केले होते.