Jalna Crime News : पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना घडली आहे. विवाहिता आणि तिच्या मुलाला तिच्याच आई-वडिलांनी साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होते. या मागे जे कारण समोर आले आहे ते डोकं सुन्न करणारे आहे. जालना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पालकांनी कैद करुन ठेवलेल्या आई आणि मुलाची पोलिसांनी सुटका केलीय आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून आई वडिलांनी विवाहिता आणि मुलाला डांबून ठेवले होते. भोकरदन शहराजवळील आलापूर गावातील ही धक्कादायक घटना आहे. मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिला आणि तिच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं. पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली, असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे.
विवाहिता शहनाज उर्फ सोनल आणि मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्याची नावं आहेत. शहनाज उर्फ सोनल हिने छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. यामुळे मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला 2 महिने डांबून ठेवलं होतं.
काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती. सास-यानं जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून जावयाच्या पोटात चाकूचे वार केले त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आंतरजातीय विवाह करु इच्छित असलेल्या मुलीचा जन्मदात्यानीच खून केल्याची घटना परभणीत घडली होती. पालम तालुक्यातील नाव्हा इथं ही घटना घडली. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मुलीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी आई-वडिलांसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.