महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट...

हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 6, 2014, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर/नाशिक
हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.
अहमदनगर जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट आणि मुसळधार पावसानं झोडपलं. जिल्हयातल्या कोपरगाव तालुक्यातल्या पश्चिम भागात मोठया प्रमाणात गारांचा पाऊस पडला. यात इंदुबाई चांदुगडे या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. तर गारांच्या माऱ्यामुळे आणखी एक महिला जखमी झालीय. तालुक्यातल्या चासनशळी, जेऊरकुंभारी या गावात जोरदार गारांचा पाऊस झाला. या गारांचा थर सुमारे 6 इंच साचला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे या भागात मोठया प्रमाणात असलेल्या द्राक्ष पिकांचं नुकसान झालंय.
तर, मराठवाड्याची उभी पीकं आडवी केल्या नंतर गारपीट आणि बेमोसमी पावसानं काल नाशिक जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवलाय. जिल्ह्याच्या सिन्नर, सटाणा, निफाड या भागात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलंय. द्राक्ष, डाळींब, हरभरा, गहू कांदा, फ्लॉवर, कोबी ह्या पिकांना बेमोसमी पावसाचा फटका बसला असून शेतकरी देशोधडीला लागलाय. गारपीटीच्या तडाख्यामुळे सिन्नर तालुक्यातील एका शेतक-याचाही मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत असून अवकाळी पाऊस केवळ शेतक-यांच्या पिकावर नाही तर जिवावर उठल्याची भावना व्यक्त होतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.