सावधान : तुम्ही बनावट मोबाईल तर विकत घेतलेला नाही ना?

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५२ लाख रुपयांचे ‘सॅमसंग’ कंपनीच्या मोबाईल अॅक्सेसरीज मुंबई पोलिसांनी जप्त केल्यात. दिवाळीत ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता ही बनावट अॅक्सेसरीज बाजारात आणण्यात आली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2013, 11:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५२ लाख रुपयांचे ‘सॅमसंग’ कंपनीच्या मोबाईल अॅक्सेसरीज मुंबई पोलिसांनी जप्त केल्यात. दिवाळीत ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता ही बनावट अॅक्सेसरीज बाजारात आणण्यात आली होती.
दिवाळीत तुम्ही मोबाईल विकत घेणार असाल तर सावधान, कारण बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट मोबाईल आणि मोबाईलच्या अॅक्सेसरीज विकण्यासाठी आणण्यात आल्यात. यात सॅमसंग कंपनीचे बनावट हेडफोन्स, बॅटरी आणि मोबाईलचे कव्हर्स यांचा समावेश आहे. पायधुणी पोलिसांनी छापा टाकून अशा तब्बल ५२ लाख १० हज़ार रुपयांचा बनावट अॅक्सेसरीजचा साठा जप्त केलाय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश अहिर यांनी दिलीय.
पोलिसांना संशय आहे की, बनावट मोबाईल अॅक्सेसरीज बाजारात विकण्यासाठी आणणारी एक मोठी टोळी सक्रीय आहे आणि यात दुकानदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. पोलिसांनी पकडलेल्या बॉक्समधील एका बॉक्समध्ये सॅमसंग मोबाईल कंपनीचे हॅन्डसेट, बनावट कव्हर आहेत आणि मोबाईलच्या बॅटऱ्याही सापडल्या आहेत. पोलिसांना संशय आहे की, या बनावट अॅक्सेसरीजबरोबर बनावट मोबाईलही बाजारात विक्रीसाठी आणले जाणार आहेत, पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत.

सणासुदीच्या काळात अशा बनावट वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीकरता बाजारात आणल्या जातात, त्यामुळे मोबाईल विकत घेताना ग्राहकांनी त्यातील अॅक्सेसरीज या मान्यताप्राप्त कंपनीच्याच आहेत, याची खात्री विक्रेत्याकडून करुन घ्या जमल्यास बिलावर तसं लिहून घ्या, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.