राज्य सरकारचं मद्यप्रेमींना गिफ्ट, 'हे' तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार खुले राहणार

कोरोनामुळे गेली दोन वर्ष नववर्षाच्या स्वागतावर बंधनं होती, यंदा नववर्षाच्या स्वागतसाठी सर्वजण उत्सुक आहेत, राज्य सरकारनेही मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज दिली आहे.

Updated: Dec 23, 2022, 07:03 PM IST
राज्य सरकारचं मद्यप्रेमींना गिफ्ट, 'हे' तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार खुले राहणार title=

मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : 2022 वर्ष संपत आलंय आणि आता सर्वजण वाट पाहातायत ते नव्या वर्षाच्या (New Year) आगमनाची. गेली दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) नवीन वर्षाच्या जल्लोषावर बंधनं होती. पण आता कोरोना प्रादुर्भावात घट झाली असून बंधनंही कमी झाली आहेत. त्यामुळे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी सर्वच जण जोरदार तयारी करतायत. मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. 

मद्यप्रेमींसाठी खूषखबर
अशात राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने मद्यप्रेमींना एक गुड न्यूज दिलीय. 24, 25 आणि  31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत  बार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारकडून (State Government) मद्यप्रेमींसाठी हे न्यू इयरचं गिफ्टच म्हणावं लागेल.यातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार आहे. या तीनही तारखांना वाईशॉपही रात्री 1 वाजेपर्यंत सुरु रहाणार आहेत. गृहखात्याने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. 

हे ही वाचा ! 'म्हणून माझ्या चित्रपटात मराठी कलाकारांना रोल असतो' रोहित शेट्टीने सांगितलं कारण

पोलिसांची करडी नजर
राज्यसरकारने मद्यप्रेमींना गुडन्यूज दिली असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दारु पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.  मुंबईत मरीन लाईन्स, बँडस्टँड, नरिमन पॉइंट इथं तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते. तर ठाण्यात येऊरमध्ये बंगले आणि हॉटेलवर मोठमोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. याशिवाय उपवन, कल्याणची खाडी या ठिकाणीही गर्दी असते.

या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळातील पोलीस ठाण्यांचा पोलीस आयुक्तांनी आढावा घेतला. पोलीसबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही करडी नजर ठेऊन असणार आहेत.