भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड

Land Scam : राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. 

Updated: Nov 12, 2021, 01:01 PM IST
भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड  title=
संग्रहित छाया

मुंबई : Land Scam : राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा (BJP's Former minister land scam) उघड करणार असल्याचे आज नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मलिक यांची आरोपांची मालिका सुरुच आहे. आता भाजपच्या माजी मंत्र्याच्या घोटाळ्याचा लवकरच पुराव्यांसह भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे .(Nawab Malik say BJP's Former minister land scam )

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप करणारे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग पेडलर आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. दरम्यान, काल दुपारपासून मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे काम काहींनी सुरु केले आहे. मात्र, आम्ही याला घाबरत नाही. वक्फ बोर्डावर ईडीचा छापा. वातावरण बनवलं जात आहे, पण तसे होणार नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी हे सुरू आहे. उलट वक्फ बोर्डात आम्ही क्लीनअप ड्राइव्ह सुरू केला आहे. तो सुरुच राहणार आहे, असे मलिक म्हणाले.

जे देवस्थानाच्या नावाने मंदिर मस्जिदीच्या जागा लुटत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपच्या एका नेत्याने शेकडो एकर जमीन देवस्थानाची लाटली आहे. त्याचा भांडाफोड आम्ही करणार आहोत. मागच्या सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याने मंदिराची जमीन लाटली आहे. त्यांचा भांडाफोड लवकरच करणार आहे, असे मलिक म्हणाले.

कंगणाच्या वक्तव्याचा निषेध

यावेळी मंत्री मलिक म्हणाले, कंगणाच्या वक्तव्याचा निषेध करतो. कंगणाने स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. मनाला क्रीमचा डोस जास्त झाल्याने कंगना अशी बोलत आहे. कंगणाला अटक झाली पाहिजे तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेतला पाहिजे, असे म्हणाले. 

'भाजपवाले एसटीचा प्रश्न चिघळवत आहेत'

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे त्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. एसटी महामंडळाला सरकारमध्ये घेतले तर इतर महामंडळांची मागणी सुरू होईल, असे निर्णय झाले तर पगारासाठी देखील पैसे राहणार नाही. भाजपवाले हा प्रश्न चिघळवत आहेत. केंद्राच्या यंत्रणा खासगी होत आहेत त्याकडे देखील लक्ष द्या, असे मलिक म्हणाले.

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे बघतो पण तुम्ही केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या त्यांच्यासाठी आंदोलन करा. एअर इंडिया बीपीटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, एस टी कर्मचारी आमचे आहेत आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू, असे मलिक म्हणाले.

 जेपी नड्डा यांची भाषा लोकशाहीला मारक - मलिक

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणतात की. या सरकारला उखडून फेकू. पण सरकार उखडून टाकणे ही भाषा लोकशाहीला मारक आहेत. कुणी स्वप्न बघत असतील तर आम्ही शुभेच्छा देतो. राज्यातील जनतेला आता भाजपचा खरा चेहरा कळला आहे.

मी या लोकांना संपवणार'

नवाब मलिक म्हणाले, हाजी अरफत, मोहित कम्बोज हे चोर आहेत. या चोरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. या भंगार लोकांना संपवल्या शिवाय राहणार नाही. माझ्या बोलण्याने गैरप्रकार उघडकीस येत‌ असल्याने माझा आवाज‌ दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.