१ मिनिटात, १ हजार १११ वृक्षरोपणाचा, 'भीमपराक्रम'

०८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी, श्री अंबरिष टेकडीवर १ हजार १११ वृक्ष लावण्यात आले.

Updated: Jul 11, 2018, 01:01 AM IST
१ मिनिटात, १ हजार १११ वृक्षरोपणाचा, 'भीमपराक्रम' title=

जळगाव : जरा २ मिनिटं थांबून विचार करा, एका मिनिटात काय होतं, पण एका मिनिटात १ हजार १११ वृक्षरोपणाचा भीम पराक्रम जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात करण्यात आला आहे. अमळनेरचे तहसिलदार प्रदीप पाटील यांनी १ हजार १११ वृक्ष एका मिनिटात लावण्याची संकल्पना अंबरिष ऋुषी टेकडी ग्रुपसमोर मांडली. ही झटपट वृक्ष लागवडीची संकल्पना सर्वांनी एकमताने पार पाडण्याचा चंग बांधला. वेळ ही ठरली, विविध वृक्षांची रोपं आणून तयार ठेवण्यात आली. 

०८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी, श्री अंबरिष टेकडीवर १ हजार १११ वृक्ष लावण्यात आले. या उपक्रमात अडीच हजार नागरिकांचा समावेश होता, यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांनी देखील यासाठी विशेष प्रयत्न केले, शहरातील राजकीय मंडळी देखील या ठिकाणी वृक्षरोपणात सहभागी झाली.

महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने रोपं आणण्यात आली, आणि अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमासाठी माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांनी ११ हजार १११ रूपयांची मदत केल्याचं स्थानिक वेबसाईटने म्हटलं आहे. हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला आहे.