पालकांसोबत झोपणारी मुलं कधीच शिकत नाही 'या' 5 गोष्टी, ठराविक वेळेनंतर दिसतो नकारात्मक परिणाम

एका विशिष्ट वयानंतर, पालक आणि मुलांनी वेगळे झोपावे. खरं तर, ते मुलांच्या मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी जोडलेले आहे. मुले वेगळी झोपल्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता आणि समजता येत नाहीत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 22, 2025, 03:58 PM IST
पालकांसोबत झोपणारी मुलं कधीच शिकत नाही 'या' 5 गोष्टी, ठराविक वेळेनंतर दिसतो नकारात्मक परिणाम

मुलांनी पालकांसोबत झोपणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पालक आणि मुलं एकत्र झोपल्यामुळे त्यांच्यातील बाँडिंग चांगले होते. एवढंच नव्हे तर त्यांच्यातील भावनिक नाते देखील सुधारते. पण मुलांच्या एका विशिष्ट वयापर्यंत पालकांसोबत झोपवणे ही अतिशय गोष्ट आहे. म्हणजे वयाच्या 10 वर्षांपर्यंत मुलांना पालकांसोबत झोपवणे ही योग्य बाब आहे. पण त्यानंतर मुलांनी पालकांसोबत झोपणे हे त्यांचा मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचं समोर आलं आहे. 

 मुलं पालकांसोबत झोपल्यावर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. मुलं पालकांसोबत झोपल्यामुळे अनेक प्रमाणात ते त्यांच्यावर अवलंबून राहतात. अशावेळी जर मुलाचं योग्य पद्धतीने संगोपन झालं नाही तर त्याच्यावर नकारात्मक परिणाम होतो. याबाबतच आपण या लेखात आज जाणून घेणार आहोत. 

आत्मविश्वास होतो कमी 

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्यांना जास्तित जास्त स्वावलंबी बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. याची सुरुवात पालक छोट्या छोट्या गोष्टींनी करु शकतात. यामध्ये मुलांसाठी वेगळं बेड किंवा वेगळा रुम तयार करणे ही एक गोष्ट आहे. मुलं 10 वर्षांचा झाला की, त्याला पालकांनी वेगळे झोपवावे. पालकांनी मुलाला वेगळे झोपण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. एकटं झोपल्यामुळे मुलाची भीति देखील संपते आणि त्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. 

प्रायव्हसीचं महत्त्व 

मुलांमध्ये खासगीपणा किती महत्त्वाचा आहे याची जाणीव निर्माण करायची असेल तर पालकांनी त्यांना एकटं झोपायला देणं आवश्यक आहे. 10 वर्षांनंतर मुलं अधिक समजूतदार किंवा हुशार होतात. ते आजूबाजूच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागतात.. अशावेळी त्यांना स्वावलंबी करण्याची योग्य वेळ आहे. एका विशिष्ट वयानंतरही पालक मुलाला आपल्यासोबत झोपवत असतील तर त्याला खासगीपणा म्हणजे प्रायव्हसीचा अर्थ समजणार नाही. तो समजावण्यासाठी ही गोष्ट करणे गरजेचे आहे. 

मनातील भीती होते दूर 

मुलांच्या मनात लहानपणी अनेक पद्धतीची भीती असते. ही भीती दूर करणे अत्यंत आवश्यक असते. दहावर्षांनंतर जेव्हा मुलं मोठं होत जातं तेव्हा पालकांनी मुलांच्या मनातील हे विचार कमी करायला मदत करावी. सामान्यपणे मुलं पालकांसोबत झोपतात तेव्हा त्यांना कायमच सुरक्षित वाटते. यामुळे मुलाच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार नसतात. पण जेव्हा मुलं एकटी झोपतात तेव्हा त्यांच्या मनातील भीती निघून जाते. मुलांमध्ये आणखी जास्त आत्मविश्वास वाढू लागतो. 

मुलांना शरीराची होईल जाणीव 

10 वर्षांनंतर मुलांच्या शरीरात सकारात्मक बदल व्हायला लागतात. किशोरावस्थेत मुलं जात असताना त्याला वेगळं झोपण्यास प्रोत्साहन करावं. मुलं या वयात अनेक मानसिक आणि शारीरिक बदलांमधून जात असतात. यावेळी त्याला थोड्या स्पेसची आवश्यकता असते. कारण तो स्वतःमध्ये झालेल्या बदलांना योग्यप्रकारे समजू शकते. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर त्याला वेगळं झोपवणंच योग्य असतं 

एकटेपणाची भावना महत्त्वाची 

मुलांना मेंटल आणि पर्सनॅलिटी ग्रोथ करिता एकटं झोपवणं गरजेचं आहे. यामुळे ही मुलं स्वतःला खूप चांगल ओळखू शकतात. एकटं राहण्याचा अनुभव देखील मुलांनी घेणं तितकंच गरजेचं असतं. मुलं जेव्हा एका विशिष्ट वयानंतर पालकांपासून वेगळे झोपतात. तेव्हा मुलांना हा अनुभव देखील भेटतो. जर मुलं 24 तास कुणा ना कुणाच्या सोबत असेल तर त्याला एकटेपणाची जाणीव अजिबात नसते.