एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, दोन लहान मुलांचा समावेश; कारण समजल्यानतंर पोलीसही हळहळले

Crime News: हैदराबामध्ये (Hyderabad) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने (Suicide) खळबळ माजली आहे. कुटुंबाने शुक्रवारी रात्री जीवन संपवलं होतं. दरम्यान पोलिसांना मात्र शनिवारी संध्याकाळी याची माहिती मिळाली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.   

Updated: Mar 26, 2023, 01:20 PM IST
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, दोन लहान मुलांचा समावेश; कारण समजल्यानतंर पोलीसही हळहळले title=

Family Commits Suicide: हैदराबादमध्ये (Hyderabad) संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. Kushaiguda परिसरातील आपल्या घरात कुटुंबाने विष घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली असून सतीश (पती), वेधा (पत्नी). निशिकेत आणि निहाल अशी त्यांची नाव आहेत. मुलांचं वय 9 आणि 5 वर्ष होतं. पती, पत्नी आधी मुलांना विष पाजलं आणि नंतर आत्महत्या केली अशी माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कुटुंबाने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. दरम्यान पोलिसांना मात्र शनिवारी संध्याकाळी या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि वेधा दोघेही सॉफ्टवेअर कर्मचारी होते. मुलांच्या आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. 

"विष प्राशन करत पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. प्राथमिक तपासात मुलांना आरोग्यासंबंधी समस्या होत्या असं समोर आलं आहे. मुलं मानसिकरित्या स्थिर नव्हती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. पण त्यात फार यश मिळालं नव्हतं. यामुळे पती, पत्नी मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याचा संशय आहे. पण आम्हाला शनिवारी दुपारी 2 वाजता याची माहिती मिळाली. सतीश, वेधा, निशिकेत आणि निहाल अशी त्यांची नावं आहेत," अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशिकेतला जन्मापासूनच ऑटिझमचा त्रास होता, तर निहालला काही काळापासून ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. जोडप्याने त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले होते. इतके प्रयत्न करुनही परिस्थिती सुधारत नव्हती. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोठा मुलगा निशिकेत आजारी पडला होता. यामुळे दाम्पत्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. 

सर्व मृतदेह शवागारमध्ये ठेवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. मृतदेहांचा शवविच्छेदन अद्याप करण्यात आलेलं नाही. दरम्यान अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.