Sunil Tatkare Exclusive Interview: महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं शितयुद्ध शिगेला पोहोचलंय. शिवसेना नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्यानं पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केलाय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. 'संख्याबळावर 2022मध्ये सीएम निवडला गेला का?' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. काय म्हणाले तटकरे? सविस्तर जाणून घ्या. संपूर्ण मुलाखत रात्री 9 वाजता 'झी 24 तास'वर पाहायला मिळणार आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले इच्छुक आहेत. आपणच पालकमंत्री होणार असे बॅनर्सही त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. अदिती तटकरेंच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडल्यानंतर शिवसेनेकडून याला तीव्र विरोध झालाय. सध्या हे भिजत घोंगडं असलं तरी महायुतीतील वाद यातून उफाळून आलाय. सुनील तटकरेंनी आता यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेनं ठोकलेल्या दाव्यावरुन सुनील तटकरेंनी शिवसेनेवर टीका केलीय. संख्याबळावर पालकमंत्रिपद मागता 2022मध्ये मुख्यमंत्रिपद संख्याबळावर ठरवलं गेलं होतं का? असा सवाल तटकरेंनी केलाय. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्यानं पालकमंत्री शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका शिवसेनेची आहे. ही भूमिकाच चुकीची असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेतून शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील तीन आमदार आदिती तटकरेंवर सातत्यानं टीका करतायत. ही टीका पातळी सोडून असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केलाय.
टू द पॉईंट मुलाखतीत सुनील तटकरेंनी शिवसेनेकडून आदिती तटकरेंवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केलीय. या टीकेमुळं महायुती सरकारचीच नाचक्की होत असल्याची टीका तटकरेंनी केलीय. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडं तक्रारी केल्याचं तटकरेंनी सांगितलंय. शिवसेनेकडून वारंवार केल्या जाणा-या टीकेमुळं राष्ट्रवादी दुखावलीये. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडं तक्रार केल्याचंही तटकरेंनी सांगितलंय.
एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा सुरु आहे. तर दुसरीकडं राष्ट्रवादीशी शिवसेना नेते उभा दावा ठोकून आहेत. त्यामुळं महायुतीत महायादवी तर सुरु नाही ना? असा टोमणा विरोधकांकडून मारला जातोय.