राजस्थानला लागलेला धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडणार?

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थानच्या टीमला मोठा झटका लागलेला आहे.

Updated: May 16, 2018, 06:10 PM IST
राजस्थानला लागलेला धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडणार? title=

मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थानच्या टीमला मोठा झटका लागलेला आहे. राजस्थानचे महत्त्वाचे खेळाडू जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी राजस्थानची साथ सोडलेली आहे. २४ मेपासून लॉर्ड्सच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये या दोघांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना इंग्लंडला परतावं लागणार आहे. राजस्थानच्या टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जॉस बटलरनं मागच्या ६ मॅचपैकी ५ मॅचमध्ये अर्धशतकं केली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये लागोपाठा ५ अर्धशतकं करण्याच्या रेकॉर्डची बटलरनं बरोबरी केली होती. तर यंदाच्या आयपीएल लिलावामधला सगळ्यात महाग खेळाडू असलेल्या बेन स्टोक्सला यावर्षी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. ऑल राऊंडर असलेल्या बेन स्टोक्सची बॅट या मोसमात शांतच राहिली. तर शेवटच्या दोन मॅचमध्ये स्टोक्सनं चांगली बॉलिंग केली.

मुंबईचा फायदा होणार?

राजस्थानला लागलेला हा धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडू शकतो. राजस्थाननं आत्तापर्यंत १३ मॅचमध्ये ६ मॅच जिंकत १२ पॉईंट्स कमावले आहेत. प्ले ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना या दोन्ही दिग्ग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये शेवटची मॅच जिंकावी लागेल. शेवटची मॅच राजस्थान हारली तर त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरु असलेली स्पर्धा कमी होईल. १३ मॅचमध्ये ६ विजयांसह राजस्थानकडे १२ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे.

मुंबई सहाव्या क्रमांकावर

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईनं १२ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे १० पॉईंट्स आहेत. तर पंजाबच्या टीमनं १२ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांच्याकडे १२ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. आजची मॅच मुंबई जिंकली तर ते चौथ्या क्रमांकावर जातील. बंगळुरूनंही १२ मॅचपैकी ५ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्याकडे १० पॉईंट्स आहेत. बंगळुरूचा नेट रनरेट कमी असल्यामुळे ते ७व्या क्रमांकावर आहेत.

मुंबईला जिंकाव्या लागणार दोन्ही मॅच

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची स्पर्धा कायम ठेवण्यासाठी मुंबईला पंजाब आणि दिल्लीविरुद्धच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या दोन्ही मॅच जिंकल्या तर मुंबईचे १४ पॉईंट्स होतील. या दोन्ही मॅच जिंकण्याबरोबरच मुंबईला इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. पण १४ पॉईंट्सवरच इतर टीमही अडकल्या तर मात्र मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करणं सोपं जाईल कारण मुंबईचा नेट रनरेट इतर टीमपेक्षा चांगला आहे.