नामिबियाविरूद्ध बॅटींगसाठी का उतरला नाही विराट?

नामिबिया सामन्यादरम्यान विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला नव्हता.

Updated: Nov 10, 2021, 09:01 AM IST
नामिबियाविरूद्ध बॅटींगसाठी का उतरला नाही विराट? title=

दुबई : ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही, परंतु त्यांच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नामिबियाचा 9 विकेट्सने पराभव केला. हा सामना विराट कोहलीच्या T20 कर्णधारपदातील शेवटचा सामना होता. मात्र या सामन्यादरम्यान विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला नव्हता. दरम्यान याबाबतचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला.

कोहली फलंदाजीला आला नाही

भारतीय डावात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला नाही, त्याने सूर्यकुमार यादवला फलंदाजीसाठी पाठवलं. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली, कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी-20 सामना होता. 

सामन्यानंतर कोहली म्हणाला, 'सूर्यकुमार यादवला टी-20 विश्वचषकात फारशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तरुण असल्याने चांगली इनिंग खेळून चांगली आठवण करून घरी परतायचं आहे. सूर्यकुमार यादवनेही विराटचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. यादवने 19 चेंडूंत 4 चौकारांसह 25 धावा केल्या.

भारताने आपल्या फलंदाजीची सुरुवात अतिशय धडाकेबाज पद्धतीने केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी चेंडूवर मारा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रोहित शर्माने धमाकेदार अर्धशतक ठोकलं. त्याने 37 चेंडूत 56 धावा केल्या. राहुलने देखील 36 चेंडूत 54 धावा केल्या. नामिबियाच्या संघाने भारताला 133 धावांचे लक्ष्य दिलं होतं. जे टीम इंडियाने 1 विकेट गमावून पूर्ण केलं.