Mumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर

Mumbai News : सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात मात्र पुन्हा एकदा काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं पुन्हापुन्हा हेच प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सायली पाटील | Updated: Feb 7, 2024, 03:00 PM IST
Mumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर  title=
Mumbai news 3 persons travel to Mumbai undetected in Kuwaiti vessel latest update

Mumbai News : मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहराच्या सर्व सीमांपासून महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत सगळीकडेच सुरक्षा यंत्रणांकडून चोख सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असलं तरीही शहरात घडणाऱ्या काही घटना मात्र यंत्रणांसह नागरिकांचीही चिंता वाढवताना दिसत आहेत. मुंबई शहरात नुकतीच अशी एक घटना घडली आणि यंत्रणा पुन्हा एकदा हादरल्या. 

उपलब्ध माहितीनुसार अरबी समुद्रातून मुंबई पोलिसांच्या गस्त पथकाने कुवेतहून आलेली एक संशयास्पद बोट मुंबईच्या प्रवेशद्वारावर अडवली.  बोटीत तीन व्यक्ती असल्याची माहिती पुढील तपासातून मिळाली. पण, ते तिघंही भारतीय आहेत, असं पुढं स्पष्ट झालं. 

सदर प्रकरणी गेटवे ऑफ इंडियावर चोरी केलेल्या कुवैती बोटीतील तीन तामिळ मच्छिमारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2008 च्या मुंबईतील 26/11 हल्ल्यानंतर 16 वर्षांनंतर, या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी पुन्हा उघडकीस आल्या आहेत. कठोर गस्त असूनही भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या सावध नजरेतून बोट कशी सुटली हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हेसुद्धा वाचा : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ 

 

पोर्ट्सचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी माध्यमांशी संवाद दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुरक्षा यंत्रणेचं जहाज गस्त घालण्यासाठी निघालं असता एका कुवेती जहाजावर तीन व्यक्ती आढळून आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते तिघं मुळचे कन्याकुमारीचे असून, कुवेतमधील एका कंपनीसाठी काम करतात. जवळपास दोन वर्षांसाठी पगार न मिळाल्यामुळं आणि खाण्यापिण्याची आबाळ झाल्यामुळं त्यांनी नोकरीच्या ठिकाणहून पळ काढण्याचा मार्ग निवडला होता. या व्यक्तींचे पासपोर्टही त्यांच्या मालकापाशीच आहेत. त्यांनी जीपीएसच्या मदतीनं दहा दिवसांचा प्रवास करत मुंबई गाठली असंही तपासातून समोर आलं. इतकंच नव्हे, तर इथं पोहोचेपपर्यंत आपली दोनदा तपासणीही झाल्याचा दावा त्या तिघांनी केला. 

पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या तिन्ही व्यक्तींना हिंदी, इंग्रजी किंवा मराठी अशा कोणत्याही भाषा समजत नसल्यामुळं कुलाबा पोलिसांना त्यांच्याकडून इतर माहिती मिळवण्यात सुरुवातीला यश आलं नाही. दरम्यान आपल्याकडून गस्त घालण्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याच्या मतावर नौदल प्रवक्तेही ठाम असले तरीही ही घटना मात्र गंभीर बाब आहे हे नाकारता येत नाही.