Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 19, 2023, 07:38 PM IST
Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा  title=
संग्रहित फोटो

Monsoon Alert : आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार (Heavy Rain) पावसाने मुंबईसह राज्यभरात दैना उडवलीय. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन उद्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना उद्या सुट्टी (School-College Closed) देण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली. मुंबईला मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले. विधान भवनातील कामकाज आटोपून त्यांनी थेट मुंबई महापालिकेची कंट्रोल रुम गाठली. तिथं जाऊन त्यांनी मुंबईतील पावसाचा आढावा घेतला. जिथं लोकल बंद आहेत, तिथं बेस्ट बसेस सोडण्याची सूचना त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.

एसटी-बसेस सोडण्याचे आदेश
मुसळधार पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.  यापार्श्वभूमीवर मुंबईतल्या महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन एसटी आणि बसेस सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सीएसटीए, भायखळा दादर, घाटकोपर आणि ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी आणि बसेस सोडण्यात येणार आहेत. तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी आणि बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे. 

यंत्रणा अलर्टमोडवर
अंबरनाथ, बदलापूर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. या ठिकाणी यंत्रणा अलर्ट असून पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर असून एसडीआरएफ आणि एनडीआरए यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. जिथे लोकांच्या स्थलांतराची गरज असेल तिथे स्थलांतर करण्यात येत आहे तसंच अडकलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. काही ठिकाणी मेनहोल झाकण चोरीच्या घटना घडल्या असून अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मुंबईत 110 सखल भागात आहेत, सगळे बघितले, कुठेही पाणी भरलेलं नाही, वाहतूक बंद नाही. मुंबईत कुठेही पाणी साचलेलं नाही, त्यामुळे लोक कौतुक करतायत. चांगल्या कामाचं कौतुक करायलाच हवं त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचं कौतुक करतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 450 ठिकाणी पंप लावले असून पाणी भरलं की पंप सुरू होतात. नालेसफाईचा देखील परिणाम पाहायला मिळतोय, हार्ड बेस लागेपर्यंत नालेसफाई झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

सगळी सिस्टीम कार्यान्वित 
रायगड मध्ये पाणी ओसारतय, तिकडे tdrf पाठवलं आहे, पनवेल, नवी मुंबई महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत की रायगडला मदत करा. चंद्रपूर गडचिरोली या भागातल्या परिस्थिती ही माहिती घेतली आहे
समुद्राला उधाण आहे त्यामुळे गरज नसताना लोकांनी तिकडे जाणं टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.