पायाभरणी कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचा काय होता नेमका गोंधळ?

कार्यक्रमाला अनेक जणांना आमंत्रण नसल्याने सरकारवर टीका होत होती.

Updated: Sep 18, 2020, 03:01 PM IST
पायाभरणी कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचा काय होता नेमका गोंधळ? title=

दीपक भातुसे, मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अनेकांच्या नाराजीमुळे रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. 

मुख्यमंत्री कार्यालयाचा गोंधळ

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती.

- अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यांनी आज पुण्यात विविध कार्यक्रम आणि बैठक घेतल्या होत्या.

- ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

- स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता.

- शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती, मात्र पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.

- या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना आज सकाळी निमंत्रण देण्यात आले.

- राज्यातील विरोधी पक्षनेते तसंच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नाही.

- या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती.