हरिश्चंद्र गडावर पर्यटकाचा मृत्यू; रस्ता भरकटल्याने जंगलात अडकले

 अहमदनगर येथील अकोलेच्या हरिश्चंद्रगडावर आलेल्या सहा जणांच्या ग्रुपला धक्कादायक अनुभव आला आहे. रस्ता भरकटल्याने हे सर्व जण जंगलात अडकले यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Aug 3, 2023, 07:12 PM IST
हरिश्चंद्र गडावर पर्यटकाचा मृत्यू; रस्ता भरकटल्याने जंगलात अडकले title=

Harishchandragad Fort : धाडसी आणि थरारक अनुभव घेण्यासाठी गिर्यारोहक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने अहमदनगर येथील अकोलेच्या हरिश्चंद्रगडावर येतात. मात्र, हेच धाडस त्यांच्या जीवावर बेतत आहे. हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. धुक्यामुळे पर्यटक रस्ता भरकटले होते. जंगलात अडकल्याने त्यांना बाहेर पडणे मुश्लिक झाले. 

हरिश्चंद्र गडावर काय घडलं नेमकं?

पुण्याहून आलेले सहा तरूण दोन दिवस हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगचा अवुभव घेण्यासाठी आले होते. 1 ऑगस्ट रोजी ते येथे दाखल झाले.  तोलार खिंडीतून त्यांनी गडावर चढण्यास सुरूवात केली होती.  मात्र, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे हे पर्यटक रस्ता भरकटले.  अथक प्रयत्न करुनही त्यांना जंगालातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही.  रस्ता भरकटल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीतच मुक्काम केला.

थंडीमुळे झाला पर्यटकाचा मृत्यू

थंडी आणी पावसामुळे एका पर्यटकाची प्रकृती खालावली. रात्रभर थंडीने काकडल्याने गुरुवारी रात्री या पर्यटकाचा मृत्यू झाला.  बाळू नाथाराम गिते असं मृत पर्यटकाचे नाव आहे. तर, आणखी तीन पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामस्थ, वनविभाग आणी पोलीस प्रशासनाने मृत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केले.

हरिश्चंद्र गडावर 550 फूट खोल दरीत पडून अनुभवी गिर्यारोहकाचा मृत्यू

हरिश्चंद्र गडाहून माकडनाळ या रॉकवर चढाई करताना अनुभवी गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला होता. अरूण सावंत यांच्यासह ३० जणांचं युनिट ट्रेकिंगसाठी गेलं होतं. त्यावेळी  कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात सावंत असतानाचं ते 550 फूट खोल दरीत पडले, खडकांवर आदळले. आणि त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. विशेष म्हणजे सावंत 30 जणांच्या या टीमला लीड करत होते. महाराष्ट्रातले सर्वात अनुभवी ट्रेकर असणाऱ्यांमध्ये त्यांची गणना होती.

पर्यटांनी काळजी घेणे गरजेचे

सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधबे, तसेच गड किल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. अनेक जण येथे हुल्लडबाजी करतात स्वत:चा आणि इतरांता जीव धोक्यात घालतात. तर, अनेक जण साहस आणि धाडसी कृत्य करण्याच्या नादात मृत्यूला निमंत्रण देत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनातर्फे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. अशा अनेक ठिकाणी बरेच पर्यटक विरोध झुगारून प्रवेश करतात.