Maharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती?

Maharashtra Rain : दडी मारलेला पाऊस आता राज्याच टप्प्याटप्प्यानं परतताना दिसत आहे. त्यामुळं काही भागांमध्ये शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 17, 2023, 08:41 AM IST
Maharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती? title=
(छाया सौजन्य- स्कायमेट)/ Maharashtra Rain yelow alert to vidarbha latest monsoon updates

Maharashtra Rain : जवळपास मागील 15 दिवसांपासून राज्यातून दिसेनासा झालेला पाऊस आता परतला आहे. धीम्या गतीनं का असेना, पण हा पाऊस परतल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. विदर्भात पाऊस येत्या काही दिवसांमध्ये चांगला जोर धरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ज्या धर्तीवर हवामान विभागानं 18 ऑगस्टपासून विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी पावसाची चिन्हं पाहूनच पुढील प्रवासासंबंधीचे निर्णय घेणं योग्य ठरणार आहे. 

राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस 19 ऑगस्टपासून जोर धरणार आहे. शिवाय ठाणे, कोकण आणि मुंबईसह नवी मुंबई भागात पुढील 24 तासांमध्ये बहुतांश भागांत पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असणार आहे. गुरुवारी राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरणामुळं सर्वकाही झाकोळलं जाणार आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात निवडक भागाला विजांच्या कटकडाटासह कोसळणाऱ्या पावसाचा तडाखा बसणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस मुसधळधार बरसणाऱ्या पावसानं ऑगस्टमध्ये मात्र लपंडाव खेळण्यास सुरु केली. ज्यामुळं शेतीची कामं ताटकळली आणि बळीराजाची चिंता वाढली. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत; आतापासूनच डाऊनपेमेंट तयार ठेवा 

नाशिकमध्येही पुढील 48 तास पावसाची हजेरी असणार आहे. त्यामुळं पावसाळी पर्यटनाच्या निमत्तानं नाशिकला जायचा बेत आखत असाल, तर ही वेळ उत्तम ठरणार आहे. फक्त नाशिकच नव्हे, तर आंबोली, पाचगणी, महाळेश्वर येथेही पावसाचे ढग वातावरणाचा चार चाँद लावणार आहेत. त्यामुळं काही भागांमध्ये मुसळधार पाऊस नसला तरीही त्याची चाहूलही चित्र पालटणारी ठरणार आहे. 

 

मुंबईकरांवर पाऊस मेहेरबान! 

समाधानकारक पावसामुळं मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव 80 टक्के भरलेत. तलाव क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सातपैकी चार तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी पुढच्या वर्षीच्या जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा मुंबईतल्या तलावात असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळं या वर्षीच्या सुरुवातीला पाणी कपातीला सामोरं जावं लागलेल्या मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली, असंच म्हणावं लागेल.