पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला  आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 8, 2023, 12:01 PM IST
पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज title=
Maharashtra Rain Alert Yellow alert issued for mumbai palghar and thane for september 8

Maharashtra Rain Alert: ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, गोपाळकालाच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. गुरुवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, आज शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाने 8 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्याला जारी करण्यात आलेला यलो अलर्ट रविवारपर्यंत राहणार आहे. 

कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, येत्या तीन ते चार तासांत कोकण किनारपट्टीसह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरीत महाराष्ट्रातही पावसाचे ढग जमा झाले आहेत, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत येत्या पाच दिवसांत पावसाची तीव्रता वाढणार आहे. 

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जाणवत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे. 

नद्या कोरड्या

दरम्यान, सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अद्यापही दुष्काळसदृश्य स्थिती आहे. मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. यंदाच्या वर्षी ऐन पावसाळ्यात नद्या कोरड्या असल्याचे दिसत असून नद्यांमध्ये थेंबभर पण पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न सिन्नर तालुक्यात उपस्थित झाला आहे. तसेच नदी, नाले, बंधारे देखील कोरडे असल्याने वर्षभराचा मोठा पाणी प्रश्न नागरिकांना पडला आहे.

बीडमध्ये शेतकरी चिंतेत

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आता शेती पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झालेत मात्र अशातही काही शेतकरी पीक वाचेल यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मात्र जोपर्यंत विहिरी आणि बोरला पाणी आहे तोपर्यंतच या पिकांना पाणी देऊ शकू पाऊस जर आलाच नाही तर पाणी देणार कुठून अशी चिंता देखील शेतकऱ्यांना आहे ड्रीप आणि स्पिंकलर च्या माध्यमातून पिक वाचवण्यासाठी ची धडपड काही शेतकऱ्यांची सुरू आहे