Loksabha election 2024 : PM मोदींविरोधात कोण करणार विरोधी पक्षाचं नेतृत्व?

विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही.

Updated: Oct 10, 2021, 08:45 PM IST
Loksabha election 2024 : PM मोदींविरोधात कोण करणार विरोधी पक्षाचं नेतृत्व? title=

मुंबई : पुढील लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha election 2024) मध्ये होणार आहे. यासाठी विरोधक एकवटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याचे नेतृत्व कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही. यासंदर्भात लढा नक्कीच सुरू झाला आहे. मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वाधिक शक्ती भरत आहेत. विरोधी पक्षांना एका बॅनरखाली आणण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नैसर्गिक उमेदवार मानले गेले आहेत. ही वेगळी बाब आहे की ममतांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, केवळ तृणमूल काँग्रेस (TMC) भाजपला लढा देऊ शकते. 

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka gandhi) मोदींकडून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महागाई, जीएसटी, कृषी कायदे मागे घेणे ते खाजगीकरणापर्यंत त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारला घेरले आहे. लखीमपूर प्रकरणातही आतापर्यंत काँग्रेस सर्वात आक्रमक पक्ष म्हणून पुढे आला आहे.

काँग्रेस आणि टीएमसी व्यतिरिक्त, तिसरा पक्ष ज्यामध्ये भाजपाशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे तो म्हणजे आम आदमी पार्टी. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हळू हळू राष्ट्रीय मंचावर आपला ठसा उमटवत आहेत. पुढच्या वर्षी पक्ष उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, गुजरात आणि पंजाबमध्ये स्वतःसाठी संधी शोधत आहे. या सर्व राज्यांमध्ये पक्षाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

राहुल, ममता की केजरीवाल?

विरोधी पक्षाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, (Mamta banerjee) अरविंद केजरीवाल किंवा आणखी कोणी? या तिघांपैकी एकाचे नेतृत्व दुसऱ्याला स्वीकारेल का? म्हणजेच, ममता राहुल किंवा राहुल ममता किंवा ममता-राहुल केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतीत उतरण्यास तयार होतील का? सर्व विरोधी पक्षांना या तिघांपैकी कोणत्याही एकाच्या छत्राखाली येणे अशक्य आहे.

ममतांना काँग्रेसकडून कोणतीही आशा नाही

बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे मनोबल वाढले आहे. त्यांना तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नेण्याची इच्छा आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी मिळवलेल्या विजयानेही त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अलीकडेच ममतांनी पक्षाच्या मुखपत्र 'जागो बांगला' मध्ये एक लेख लिहिला. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भाजपला सत्तेतून काढून टाकणे काँग्रेसच्या बसची बाब नाही. हे काम फक्त तृणमूल काँग्रेसच करू शकते. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने लोकांचा विश्वास तोडला आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस भाजपविरुद्ध लढण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. हे आता सिद्ध झाले आहे. संपूर्ण देशाने आता टीएमसीकडून आशा ठेवली आहे.

लोक भाजपवर नाराज असल्याचा दावा ममतांनी या लेखात केला होता. त्यांना वेगवेगळ्या राज्यांतून फोन येत आहेत. बंगालने नवीन भारताच्या लढाईत आघाडी घ्यावी अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे. या सर्व गोष्टींसह ममतांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना लोकसभा निवडणुक 2024 मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे आहे. पण राहुल किंवा इतर कोणत्याही पक्षाचे नेते त्यांचं नेतृत्व क्वचितच स्वीकारतील. बंगालमध्ये मोठ्या विजयाची नोंद केल्यानंतर ममतांनी जुलैमध्ये दिल्लीलाही भेट दिली. त्याचा उद्देश भाजपविरोधी पक्षांना एकत्र करणे हा होता. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती.

पुढच्या लोकसभा निवडणुकीत दीदी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार करत असतील, परंतु जमिनीवरील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेनेची भूमिका त्याचे वैशिष्ट्य दर्शवते. पक्षाचे मुखपत्र सामना मधील संपादकीयमध्ये खासदार संजय राऊत यांनी टीएमसी आणि आप सारख्या पक्षांना खेळ बिघडवणारे म्हटले आहे. संजय राऊत यांनी विरोधकांच्या नेतृत्वासाठी राहुल गांधी यांना हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. सध्या शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाराष्ट्रात सरकार चालवत आहे. राऊत यांनी सूचित केले की जर टीएमसी आणि आप (AAP) सारखे पक्ष काँग्रेस आघाडीचा भाग झाले नाहीत तर त्याचा भाजपला फायदा होईल. यामुळे संपूर्ण निवडणुकीचं गणित बिघडेल.