जीतन राम मांझी यांनी घेतली नितीशकुमारांची भेट, एनडीएमध्ये होणार सहभागी?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत.

Updated: Aug 27, 2020, 04:47 PM IST
जीतन राम मांझी यांनी घेतली नितीशकुमारांची भेट, एनडीएमध्ये होणार सहभागी? title=

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत. एनडीएपासून दूर गेलेले हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली आहे. यासह जीतनराम मांझी यांची पुन्हा एनडीएत एन्ट्री होत असल्याचं चित्र आहे. एनडीएचे सहयोगी म्हणून अजून औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. 30 ऑगस्ट रोजी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे पटना येथे आगमन झाल्यानंतर याबाबतची घोषणा होऊ शकते.

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा ३० ऑगस्टला बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी जीतनराम मांझी यांच्या एनडीएत प्रवेशाची औपचारिक घोषणा होईल. यानंतर एनडीएची जागावाटप निश्चित केली जाऊ शकते. आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. बिहारमध्ये जागावाटपाबाबत भाजप आणि जेडीयू यांच्यात बोलणी झाल्याचे सांगण्यात येत आहे, पण ते जाहीर होणे बाकी आहे.

एनडीएचा कोणता घटक पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल, याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. नितीशकुमार यांनी जीतन राम मांझी यांना एनडीएत परत आणण्यासाठी प्रयत्न केले. अशा परिस्थितीत मांझी यांना जेडीयूच्या कोट्यातून जागा द्यावी लागेल, तर भाजप चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीला जागा देईल. अशाप्रकारे, एनडीएतले दोन मुख्य पक्ष आपल्या जवळच्या पक्षांना मदत करण्यासाठी काम करतील.

नितीशकुमार हे एनडीएतून वेगळे झाल्यानंतर एलजेपीने एनडीएत प्रवेश केला होता. बिहारमध्ये २००५ आणि २०१० मध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले होते. पण २०१५ मध्ये नितीशकुमार यांनी आघाडीसोबत निवडणूक लढविली आणि सरकार स्थापन केले. राजकारणाने असे वळण घेतले की जेडीयू पुन्हा आघाडीतून वेगळा झाला आणि २०१७ मध्ये एनडीएत आला. आता चिराग पासवान जास्तीत जास्त जागा मिळाव्या म्हणून प्रयत्न करत आहेत.

२०१० पर्यंत जेडीयू बिहारमध्ये भाजपसोबत १४२ जागा लढवत होती. परंतु जेडीयूने २०१५ मध्ये आघाडीमध्ये १०१ जागा लढवल्या. या निवडणुकीत जेडीयूची इच्छा आहे की त्यांनी २०१० प्रमाणे पुन्हा निवडणूक लढवावी, पण हे शक्य नाही. एलजेपी एनडीएत आली असल्याने आता एनडीएत दोन नव्हे तर तीन मित्रपक्ष आहेत आणि आता मांझीच्या प्रवेशानंतर चार पक्ष होणार आहेत. अशाप्रकारे, जागावाटपाच्या जुन्या फॉर्म्युलावर चर्चा केली जाणार नाही.

२०१५ च्या महायुतीच्या जागावाटपानुसार, भाजप १०१, जेडीयू १०१ आणि एलजेपी ४१. पण २०२० च्या निवडणुकीत जेडीयू या फॉर्म्युलासाठी तयार होणार नाही. जेडीयूला नेहमी सर्वाधिक जागा लढवायच्या असतात, म्हणजेच जेडीयू १२० पेक्षा कमी जागांवर तयार होणार नाही.

अशा प्रकारे एकूण २४३ जागांपैकी जेडीयू आणि भाजपमध्ये समान जागा विभाजित केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातून जवळच्या मित्रपक्षांना जागा देण्याचे काम करतील. अशा परिस्थितीत जेडीयू मांझी यांच्या पक्षाला १० जागा देऊ शकते, तर पासवान यांच्या पक्षाला भाजप सुमारे २३ जागा देऊ शकेल, असा विश्वास आहे. अशा प्रकारे जागावाटपाचे सूत्र ठरविले जाऊ शकते.