'गुलाबी'चे टायटल साँग उलगडणार 3 मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट

मराठी चित्रपट 'गुलाबी'चे टायटल साँग नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. सध्या या गाण्यची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 24, 2024, 05:40 PM IST
'गुलाबी'चे टायटल साँग उलगडणार 3 मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट title=

Gulabi Title Song Out : 'गुलाबी' चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळणार आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील गाण्याला साई - पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास या गाण्यातून उलगडत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

नुकतेच प्रदर्शित झालेले 'गुलाबी' चित्रपटातील हे गाणे ऐकायला खूपच खास आहे. तितकेच या गाण्याचे सादरीकरण देखील खूपच कमाल आहे. या गाण्यावर चाहत्यांनी रील्स देखील बनवण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर या गाण्याला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. त्यासोबत चाहते युटूबवर या गाण्यावर सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्स करत आहेत.  

पहा गाणं

या चित्रपटात तिघींची बहरत जाणारी मैत्री दाखवण्यात आली आहे. या गाण्यामध्ये जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही यात अधिक रंगत आणत आहे. तीन मैत्रिणींच्या जीवनातील अनोख्या प्रवासाची एक झलक या गाण्यातून दिसत आहे.  

चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर 'गुलाबी' चित्रपटाबद्दल काय म्हणाले,  'गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पिंक सिटीमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळणार आहेत. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलं जाईल असं ते म्हणाले. 

व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा मराठी चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.