पांडू म्हणतोय, घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या आणि सूचनांचं पालन करा

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वारंटाईन मध्ये काय करतोय...

शैलेश मुसळे | Updated: Apr 2, 2020, 12:54 PM IST
पांडू म्हणतोय, घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या आणि सूचनांचं पालन करा title=

मुंबई : "इसारलंय", "त्या माका काय माहित?", हे डायलॉग आज सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकर सोशल डिस्टंसिंग आर्वजून पळतोय आणि त्याबद्दल तो सगळ्यांना आवाहन देखील करतोय.

लेखक अभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणतोय की, "कोरोना या विषाणूने अख्ख्या जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. लोक भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करतात आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि सरकारने आपल्यावर नियम लादले नाही आहेत पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळून घरात राहूया. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर अनेक मेसेजेसच्या रूपात बऱ्याच अफवा पसरतात, त्या अफवांकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करून मननीय मुख्यमंत्री ज्या सूचना देतात त्या सूचनांचं पालन करूया. हा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करूया."  

"इसारलंय", "त्या माका काय माहित?", हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे  डायलॉग्स लोकप्रिय झाले आहेत त्या रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वारंटाईन मध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी प्रल्हाद सोबत साधलेला हा खास संवाद

१. कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे आणि त्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, तू तुझ्या प्रेक्षक चाहत्यांना काय आवाहन करशील?

- कोरोना या विषाणूने अख्ख्या जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. अशावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पण आपण या लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया. कारण जग आता जरी थांबलं असलं तरी ते लॉकडाऊन नंतर पाळणार आहे आणि अधिक वेगाने पाळणार आहे. लॉक डाऊन म्हणजे नजरकैद नसून सरकारने आपली घेतलेली काळजी आहे.

२. या लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ तू कसा घालवतोय?

- लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या फावल्या वेळात आपण अनेक गोष्टी करू शकतो. मी खूप वाचन करतोय, अनेक नवीन पुस्तकं वाचतोय. जे माझ्या मनात येईल ते मी कागदावर उतारावतोय. मालिका लिहीत असताना अनेकदा सिनेमे, वेबसिरीज पाहायच्या राहून जातात, ते मी आता बघतोय. आणि अर्थातच घरातल्या काही कामांमध्ये हातभार लावतोय. नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय.

३. लोक लॉकडाऊन असताना देखील अनेक ठिकाणी गर्दी करतात आहेत, त्यांना तू काय सांगशील?

- लोक भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करतात आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि सरकारने आपल्यावर नियम लादले नाही आहेत पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळूया. घरात राहूया

४. सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरत आहेत, त्याबद्दल तू सर्वांना काय सांगशील?

- व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर अनेक मेसेजेसच्या रूपात बऱ्याच अफवा पसरतात, त्या अफवांकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करूया. आपले माननीय मुख्यमंत्री आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. लाईव्ह येऊन अगदी घरातील कुटुंबीयांप्रमाणे आपल्याशी गप्पा मारत आहेत, आपल्याला सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करूया. हा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करूया.

५. तू गाव गाता गाजली या मालिकेतील कलाकारांसोबत जनजागृतीसाठी एक व्हिडिओ देखील केला आहेस, त्याबद्दल थोडक्यात सांगशील.

- आशा कठीण काळात जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांसाठी मालवणी भाषेत एक व्हिडीओ बनवला ज्यात आम्ही त्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील जनता हा लॉकडाऊन नक्की यशस्वी करेल याची मला खात्री आहे. म्हणजे थांबलेलं हे जग, थांबलेले आपण पुन्हा एकदा या लॉकडाऊन नंतर वेगवान पळू. पण त्यासाठी आता घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या.