अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक

Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.

राजीव कासले | Updated: Oct 5, 2024, 04:47 PM IST
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक title=

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Team) तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर (Irani Cup 2024) नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा (Rest of India) पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. पंधराव्यांदा मुंबईने इराणी चषकावर नाव कोरलं आहे. लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमव झालेल्या मुंबई आणि शेषभारतदरम्यानचा सामना ड्रॉ राहिला. पण पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबई क्रिकेट संघाला विजयी घोषित करण्यात आलं. याआधी मुंबईन 1997 मध्ये इराणी कप जिंकला होता. 

सर्फराज खान मुंबईच्या विजयाचा हिरो
मुंबई क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो पहिल्या डावात दुहेरी शतक करणारा सर्फराज खान. मुंबईने पहिल्या डावात 537 धावा केल्या होत्या. यात सर्फराज खानचा वाटा होतात तब्बल नाबाद 222 धावांचा. सर्फराजने 286 चेंडूंचा सामना करत तब्बल 25 चौकार आणि चार षटकारांची बरसात केली. सर्फराजला अजिंक्य राहणे, तनुष कोटियन आणि श्रेयस अय्यरची दमदार साथ लाभली. कर्णधार अजिंक रहाणेने 97 धावे केल्या तर तनुष 64 आणि अय्यरने 57 धावा केल्या. 

पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि यश दयालला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियाचा डाव 416 धावांवर आटोपला. अभिमन्यू इश्वरनने 191 धावांची झुंजार खेळी केली, तर ध्रुव जुरेलने 93 धावा करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. 

दुसऱ्या डावात तनुषचं शतक
दुसऱ्या डावात मुंबईने 8 बाद 329 धावा केल्या. यात तनुश कोटियनने नाबाद 114 धावा केल्या. तर पृ्थ्वी शॉने 76 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आलं. तर दुहेरी शतकवीर सर्फराज खानला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. 

इराणी कप स्पर्धा
इराणी कप ही भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा आहे. रणजी ट्रॉफी चॅम्पियन संघ आणि इतर संघातील बेस्ट खेळाडूंच्या संघात ज्याला रेस्ट ऑफ इंडिया म्हटलं जातं त्यांच्यात सामना होतो. पहिल्यांदा 1959-60 मध्ये इराणी कपचा सामना खेळवण्यात आला होता. मुंबई संघाने आतापर्यंत सर्वाधिक 15 वेळा इराणी कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर रेस्ट ऑफ इंडियाने सर्वाधिक 30 वेळा जेतेपद पटकावलं आहे.

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तमोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन दियास.

रेस्ट ऑफ इंडिया : ऋतुराज गायकवाड, अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, ईशान किशन, मानव सुथार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर