यापूर्वी १६ वेळा एकट्यानंच यशस्वी केली आंदोलनं - अण्णा

जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2013, 10:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी
जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.
राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णांनी बेमुदत आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. दरम्यान, ‘प्रकृती बिघडल्याच्या नावाखाली सरकारने मला उचलले तर पाणी पिणेही सोडून देईन’ असा इशारा अण्णांनी दिलाय. तर जनलोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी यांनी दिलीय. परंतु सरकारकडून कुणीही अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. यावेळी केवळ आश्वासन देऊन भागणार नाही, असे अण्णांनी स्पष्ट केलंय.
अरविंद केजरीवाल आणि जुन्या सहकाऱ्यांची आठवण येण्याची गरज नाही. यापूर्वी १६ वेळा मी एकट्याने आंदोलनं यशस्वी केलीत, असेही अण्णांनी म्हटलंय.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेतली. परंतु अण्णांनी आपली तब्येत ठणठणीत असल्याचं सांगत थोरातांची विनंती धुडकावून लावली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.