आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.

Updated: Jan 7, 2012, 04:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. इंदू मिलची लढाई आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या सभेला महत्व आलं आहे. आनंदराज आंबेडकर यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे.

 

इंदू मिल प्रश्नी ६ डिसेंबरला आंदोलन केल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या रुपानं दलित समाजाला नवीन नेता मिळाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आरपीआयच्या आजच्या सभेत रामदास आठवले काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

इंदू मिल प्रश्नावर दलित नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरु आहे. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला. २६ जानेवारीपर्यंत केंद्रानं इंदू मिलची संपूर्ण जागा दिली नाही तर पंतप्रधानांना घेराव घालण्याचा इशारा आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी वरळीतल्या सभेद्वारे आनंदराज आंबेडकर यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

 

६ डिसेंबरला आंदोलन केल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नावाचा बोलबाला सुरु झाला. या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शेरोशायरी करत जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान केवळ महापालिकाच नाही तर शिवसेना-भाजप बरोबर जिल्हा परिषदेतही युती करावी असा रिपाइंची प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात येत्या ११ तारखेच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं पक्षाच्यावतीनं सांगण्यात आलं.